सध्या दिवाळीच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर विविध उत्पादनांच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत. यापैकी ‘मान्यवर’ या सणासुदीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्त्रप्रावरणांच्या ब्रँडची जाहिरात सध्या चर्चेचा विषय आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील रिअल लाईफ केमेस्ट्री या जाहिरातीत पुरेपूर दिसत आहे. याशिवाय, विराट कोहलीचा जाहिरातीतील व्यावसायिक अभिनय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला. त्यामुळे आता अनुष्का आणि विराटच्या नात्याची नव्याने चर्चा रंगली आहे. यामध्ये दोघांचे लग्न हा प्राधान्याचा विषय आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

हल्ली तर त्यांनी आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याची हीच योग्य वेळ आहे, हे त्यांच्या अनेक चाहत्यांनी मनोमन ठरवून टाकले आहे. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार विराटने डिसेंबर महिन्यात बीसीसीआयकडे दीर्घ सुट्टी मागितल्याची चर्चा होती. विराट या काळात बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा त्यामुळे रंगायला लागली. मात्र, विराट कोहली अशा कोणत्याही सुट्टीवर जाणार नसल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तुर्तास या चर्चेला विराम मिळाला असला तरी अनुष्का आणि विराट लवकरच लग्नबंधनात अडकतील, अशी शक्यता दिसतेय.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

विराट आणि अनुष्का सध्या भारतातील ‘मोस्ट हॅपनिंग कपल्स’च्या यादीत अग्रस्थानी आहेत. अनुष्का आणि विराट सध्या आपापल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर आहेत. तरीही ते एकमेकांना जमेल तितका वेळ देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांच्या रिलेशनशिपकडे आदर्श नाते म्हणूनही पाहिले जात आहे.