अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान बॉलिवूड क्षेत्रात २५ वर्षाहून अधिककाळ अधिराज्य गाजविताना दिसते. दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट पैसा वसूल नव्हे तर हाऊसफुल चालातात. यातून त्यांचा दबदबा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. देशासह जगभरात या दोन अभिनेत्यांचे चित्रपट धमाल करतात. त्यामुळे या दोन कलाकारांची एकत्रित एन्ट्री काय धमाल करेल, असा प्रश्न नेहमीच बॉलिवूडमध्ये तसेच दोघांच्या चाहत्यांमध्ये पडत असतो. या प्रश्नावर खुद्द सलमान-शाहरुखने खुलासा केला आहे.  दोघांच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात ‘करण-अर्जून’ या चित्रपटात  दोघांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर शाहरुख खानची आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. तर सलमानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटात शाहरुखने पाहुण्याची भूमिका साकारली होती.  ‘हम तुम्हारे हैं सनम’ या चित्रपटात सलमानने शाहरुखसोबत सह कलाकाराची भूमिका साकारली होती.

सर्वात शेवटी सलमान-शाहरुख जो़डी ‘ओम शांति ओम’ या चित्रपटातील एका गाण्यामध्ये दिसली होती. त्यानंतर दोंघाच्यातील वाद हा जगजाहीर आहे. जून्या वादाला विसरुन आता दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. बऱ्याचदा दोघांना एकत्र फिरताना देखील पाहायला मिळते. त्यांच्या जवळकीनंतर आता प्रत्येकाच्या डोक्यातील  दोघे एकत्रित कधी येणार हा प्रश्न पुन्हा प़डला आहे. त्यांनी एकत्रित काम करावे, अशी दोघांच्या चाहत्यांची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर  रविवार झालेल्या ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड्स’च्या व्यासपीठावर सलमान-शाहरुखने आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. कार्यक्रमामध्ये त्यांनी एकत्रित काम करण्यास तयारी  दर्शविली. आम्हाला दोघांना  बुद्धिमान लेखक आणि संयमी निर्माता एकत्र आणू शकतो, असे त्यांनी म्हटले.

या  कार्यक्रमात त्यांना  कोणत्या दिग्दर्शकासोबत तुम्हाला एकत्र  काम करायला आवडेल, असे देखील विचारण्यात आले. कोणासोबत काम करायच ते आमच्या  डोक्यात आहे सांगितले, मात्र नाव स्पष्ट केले नाही.  गेली बरीच वर्षे या दोन्ही कलाकारांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा सरतेशेवटी पूर्ण होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.