बॉलीवूडमध्ये रेकॉर्ड तयार करण्यात तिनही खान कलाकरांचा हातखंडा आहे. कोटीच्या कोटी कमाई करून सलमान, आमिर आणि शाहरुख हे नवनवे रेकॉर्ड तयार करत आहेत. त्यातचं आता सलमानच्या नावावर अजून एक रेकॉर्ड तयार झाला आहे. सलमानने वर्षभरात केवळ दोन चित्रपटांतूनचं बॉलीवूडला ५०० कोटींचा गल्ला कमावून दिलायं.
पुढच्याचं महिन्यात पन्नाशी गाठत असलेल्या सलमानचा ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास २०० कोटींच्या घरात कमाई केली आहे. त्यापूर्वी, प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने ३१५ कोटींचा गल्ला कमाविला होता. त्यामुळे सलमानच्या या दोन चित्रपटांनी बॉलीवूडला आतापर्यंत ५०८ कोटींची कमाई करून दिली असून, हा आकडा अजूनही वाढेत जाईल. सलमाननंतर अर्थातचं आमिरचा नंबर लागतोय. वर्षाला केवळ एक चित्रपट किंवा कधीतरी तेसुद्धा न करणा-या आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटाने ३३८ कोटींचा गल्ला कमाविला होता. तसे बघावयास गेले तर मग आमिर कुठेतरी सलमानपेक्षाही वरचढ ठरतो. यापाठोपाठ सलमानचा ‘एक था टायगर’ने ३३५ कोटी आणि ‘दबंग २’ ने ३२० कोटींचा गल्ला कमविलेला होता. त्यापाठोपाठ बॉलिवूडचा बादशाहा शाहरुखचा २०१३ साली प्रदर्शित झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट असून या चित्रपटाने २०७ कोटींचा गल्ला कमविला होता. त्याचवर्षी लागोपाठ प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘धूम ३’ने  २६० कोटींची कमाई केली होती.
यावर्षी आमिर आणि शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने बॉक्स ऑफिसवर सलमानचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे. मात्र, पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणारा शाहरुखचा दिलवाले बॉक्स ऑफीसवर जादू चालविण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.