कपिल शर्माने बॉलिवूडच्या दबंग खानचे म्हणजेच सलमानचे आभार मानण्याची गरज आहे. तर असं का? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. कपिल शर्मा आणि त्याचे सहकारी सुनील ग्रोवर (रिंकू भाभी), अली असगर (नानी), चंदन प्रभाकर (चंदू) आणि सुगंधा मिश्रा (टीचर) यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच विमान प्रवासात वाद झाला होता. कपिलसोबत झालेल्या वादानंतर या कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’ला राम राम ठोकला आणि त्याचा परिणाम टीआरपीवर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कपिलला लोकांचे मनोरंजन करण्यासाठी केवळ एक महिन्याचा अवधी देण्यात आला होता. पण, ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार हा अवधीत आता दोन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. कपिलच्या शोच्या जागी येणाऱ्या सलमानच्या ‘दस का दम’ या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने असे करण्यात आलेय.

वाचा : कपिलच्या शोमध्ये ‘एफयू’चं प्रमोशन, चित्रपटांच्या प्रसिद्धीचा बदलता फंडा

घसरत्या टीआरपीमुळे ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे कपिलच्या चाहत्यांची निराशा झालेली. पण, कपिलला अजून दोन महिन्यांचा कालावधी मिळाल्याने पुढचे काही दिवस तरी तो लोकांचे मनोरंजन करू शकणार आहे. या शोच्या जागी नंतर सलमानचा ‘दस का दम’ हा कार्यक्रम जागा घेईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः सलमानच करणार आहे. सध्या सलमान ‘ट्युबलाइट’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांच्या कामात असल्यामुळे त्याच्या या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

वाचा : हॉलिवूडपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रियांका या गोष्टीमुळे झालीयं हैराण

सलमानने कतरिना कैफसोबत ‘टायगर जिंदा है’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘दस का दम’ पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यात सुरु होईल. केवळ सलमानकडे तारखा नसल्यामुळेच सोनी वाहिनीने कपिलला त्याचा शो सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, ‘द कपिल शर्मा शो’ने पुन्हा टॉप १० कार्यक्रमांमध्ये स्थान मिळवले आहे. मात्र, तरीही या शोची रेटिंग फारशी चांगली नाही.

‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल’ने जाहीर केलेल्या टीआरपीनुसार १३ ते १९ मेदरम्यान कपिलच्या शोला ३४९५ इम्प्रेशन्स मिळाले. तर झी वाहिनीवरील ‘कुमकुम भाग्य’ला १०८१२ इम्प्रेशन्स मिळाले आहेत. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांमधील एवढी मोठी तफावत पाहता सध्या ‘कुमकुम भाग्य’ मालिकेचेच टेलिव्हजनवर अधिराज्य असल्याचे दिसून येते. कपिल शर्मा हा सर्वाधिक मानधन घेणारा टेलिव्हिजन कलाकार असून तो ‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या सिझनमध्ये सहभागी झाला होता.