बॉलिवूडमध्ये हल्ली कलाकार चित्रपटांव्यतिरिक्तही इतर विविध कार्यक्रमांमध्ये सुद्धा व्यग्र असतात. अशाच काही व्यग्र आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता सलमान खान. चित्रपटांच्या चित्रिकरणासोबतच भाईजान सध्या बिग बॉस या वादग्रस्त कार्यक्रमाच्या १० व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहे. बऱ्याच कारणांनी बिग बॉसचे यंदाचे हे पर्व चर्चेत असताना आता आणखी एका कारणामुळे बिग बॉस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बिग बॉसच्या घरात आणि मंचावर नेहमीच विविध सेलिब्रिटी मोठ्या उत्साहात हजेरी लावत असतात. पण, यावेळी मात्र एका लहान आणि गोंडस पाहुण्याने या क्रार्यक्रमाच्या मंचावर सलमानला साथ दिली आहे. तो खास पाहुणा म्हणजे सलमान खानच्या बहिणीचा मुलगा, अहिल.

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या भाच्यामध्ये असणारे अनोखे मामा-भाच्याचे नाते आपण सारे जाणतोच. नुकतेच ज्यावेळी सलमानने बिग बॉसच्या विकेंड का वार या खास भागाचे लोणावळा येथील सेटवर चित्रिकरण केले त्यावेळी सलमान आणि अहिलची भेट झाली. सलमान या चित्रिकरणात व्यग्र असतानाच त्याची बहिण अर्पिता तिच्या पती आणि मुलासह सेटवर आली. अहिल सेटवर आल्याचे कळताच सलमानने चित्रिकरणातून काहीसा वेळ काढत अहिलसोबत मज्जा मस्ती करण्यास प्राधान्य दिले. यावेळी काढलेले सलमान आणि अहिलचे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आले होते. या फोटोंमध्ये सलमानने अहिलला उचलले असून त्या दोघांच्याही चेहऱ्यावर सुरेख असे स्मित खुलले आहे. सलमानने अहिलला यावेळी बिग बॉसच्या मंचावरही नेले आणि त्याला मिश्किलपणे विचारले की, ‘तू माझ्यासोबत या शोचे सूत्रसंचालन करणार आहेस का?’. इतक्यावरच न थांबता त्याने अहिलच्या हाती माइक देत त्याला एक ओळही बोलून दाखवली. जी ओळ सलमान नेहमीच या शोच्या सुरुवातीला म्हणतो. पण, ‘मामूजान’ सलमानप्रमाणे सूत्रसंचालन करण्यापेक्षा अहिलने त्या माइकसोबत खेळण्यालाच प्राधान्य दिले.

unnamed7

unnamed-18

unnamed-25

यावेळी बिग बॉसच्या सेटच्या जवळ असणाऱ्या एका दुसऱ्या सेटवर ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाचे चित्रिकरणही सुरु होते. पण, अहिल बिग बॉसच्या सेटवर आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याला पाहण्यासाठी, त्याची भेट घेण्यासाठी जॅकलिन फर्नांडिज, करण जोहर, फराह खान, गणेश हेगडे हे कलाकारही आले होते. रिअॅलिटी शो च्या हल्लीच्या दिवसांमध्ये अनेक वाहिन्यांवर अनेक नवे रिअॅलिटी शो सुरु होत आहेत. त्यामुळे सलमान खानच्या बिग बॉस या कार्यक्रमापासून ते अगदी गाण्यांच्या रिअॅलिटी शोपर्यंत सर्वच क्रार्यक्रम त्यांचा प्रेक्षक वर्ग टिकवून ठेवण्यासाठी आणि टीआरपीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे.