बॉलिवूडचा 'खलनायक' म्हणजेच संजय दत्त आता चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा 'भूमी' चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांसाठी तो अनेक ठिकाणी भेट देतोय. याचदरम्यान त्याने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी सांगितल्या. संजूबाबा आणि मान्यता यांना शाहरान आणि इकरा ही जुळी मुलं आहेत. संजय तुरुंगात होता तेव्हा मुलांना सतत आपल्या वडिलांची आठवण यायची. याबद्दल संजय म्हणाला की, 'मुलांनी मान्यताला, बाबा कुठे आहेत? असे विचारल्यावर ती त्यांच्याशी खोटं बोलायची. बाबा शूटिंगसाठी मुंबईबाहेर गेले आहेत, अशी काहीतरी कारणे देऊन ती त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधत असे.' संजय तुरुंगात असतानाचा काळ त्याच्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप खडतर होता, असेही संजूबाबाने सांगितले. वाचा : कास्टिंग काउचबद्दल धोनीची पूर्वप्रेयसी म्हणते.. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अवैधरित्या शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. ही शिक्षा भोगून आल्यानंतर आता संजूबाबा सर्वसामान्य आयुष्य जगत आहे. मात्र, तुरुंगात असताना १५ दिवसांतून केवळ एकदाच त्याला कुटुंबाशी बोलण्याची परवानगी होती. केवळ त्याचवेळी तो आपल्या मुलांशी संवाद साधू शकत होता. याव्यतिरिक्त मुलं जेव्हा बाबांना फोन लावून दे, असे मान्यताला सांगायची तेव्हा तिची तारांबळ उडायची. 'बाबा डोंगराळ भागात शूटिंग करत असून, तेथे फोनला नेटवर्क नाहीये', असे सांगून ती वेळ मारून न्यायची, असेही संजूबाबा म्हणाला. वाचा : सलमानच्या बहिणीच्या नवऱ्याचा 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसह काम करण्यास नकार संजय दत्त दिवंगत अभिनेता सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा आहे. आई- वडिलांच्या कलेचा वारसा त्याने पुढे चालवला. आगामी 'भूमी' चित्रपटात तीन मुलांच्या वडिलांच्या भूमिकेत असलेला हा अभिनेता त्याच्या मुलांसाठी काही वेगळीच स्वप्न पाहतोय. यावर तो म्हणतो, ‘मी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी शिकवतोय. मोठ्यांचा, मदत करणाऱ्यांचा आदर करणे, संस्कार, चाली-रिती समजून घेणे या सर्व गोष्टींची मी त्यांना शिकवण देतोय. मी फक्त एवढीच प्रार्थना करु इच्छितो की, मुलाने माझ्याप्रमाणे होऊ नये. कारण, माझ्यामुळे माझ्या वडिलांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, त्याच यातना सोसण्याची माझी इच्छा नाही.’