हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही 'पिक्चर परफेक्ट फ्रेम' असणाऱ्या चित्रपटांचा नजराणा देणारे एक दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी. 'हम दिल दे चुके सनम', 'खामोशी', 'सावरिया', 'देवदास', 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी' अशा चित्रपटांद्वारे भन्साळींनी त्यांचा स्पेशल टच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देऊ केला आहे, असेच म्हणावे लागेल. कारकिर्दीच्या आजवरच्या प्रवासामध्ये संजय लीला भन्साळी यांना काही चढ उतारांनाही सामोरे जावे लागले आहे. 'सावरिया' आणि 'गुजारिश' या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ आणि त्यानंतर झालेली टीका या साऱ्या गोष्टीवर पडदा टाकत भन्साळी नव्या जोमाने प्रेक्षकांच्या भेटीला आले ते म्हणजे रामलीला या चित्रपटाद्वारे. 'पिक्चर परफेक्ट फ्रेम' ही भन्साळींच्या चित्रपटातील मुख्य बाब आहे. भव्यता, कथानक मोठ्या पडद्यावर जिवंत करण्यासाठीची त्यांची मेहनत आणि निकालस्वरुपी हाती येणारा चित्रपट ही साऱ्या समीकरणाचं उत्तर म्हणजे संजय लीला भन्साळी. हिंदी चित्रपटसृष्टीत आज त्यांची जी काही ओळख आहे त्याचा भन्साळींना जराही गर्व नाही. भन्साळी यांच्या कुटुंबातही कलेचा वारसा होता. पण, त्यामुळेच त्यांच्या बालपणातील काही काळ त्यांना भुलेश्वर येथील एका चाळीत व्यतीत करावा लागला होता. याविषयीचीच एक आठवण सांगताना एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भन्साळी म्हणाले होते, 'माझ्या बालपणीच्या काही अठवणी विचारलात तर, गडद आणि विविध रंगांचे कपडे परिधान केलेल्या देहव्यापार करणाऱ्या महिला आणि ती सर्व वस्ती माझ्या डोळ्यासमोर येते.' दिग्दर्शन, निर्मितीसोबतच संगीत क्षेत्रातही भन्साळी यांना आवड आहे. याचविषयी सांगताना ते म्हणाले होते, 'माझ्याकडे एक रेडिओ होता. प्रत्येक गाणे ऐकताना मी त्या गाण्याचे चित्रिकरण कसे करेन याविषयीचा विचार करत असायचो'. भन्साळी यांचे संगीतप्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळाले ते म्हणजे 'खामोशी- द म्युझिकल' या चित्रपटातून. रोजच्या जीवनातील घटकांपासून प्रेरित होत संजय लीला भन्साळी यांनी अनेकांच्या मनावर छाप पाडण्यात यश मिळवले आहे. सध्या ते आगामी 'पद्मावती' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाद्वारे ते पुन्हा एकदा एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. याआधी त्यांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटाद्वारे मराठ्यांच्या इतिहासातील एक काळ पडद्यावर साकारला होता. सध्या भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाबद्दल बऱ्याच चर्चा आणि काही वाद रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रितरणादरम्यानही गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले होते. पण, त्यानंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली असून चित्रपटाच्या चित्रिकरणास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.