बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर कामाचे पैसे न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. सरोज खान म्हणाल्या, रामलीला या सिनेमातील एका गाण्यासाठी संजय लीला भन्साळी यांनी माझ्याकडून दहा दिवस काम करवून घेतले. मात्र ऐनवेळी हे गाणे दुसऱ्याकडूनच कोरिओग्राफ केले. मी जे दहा दिवस त्यांच्यासाठी काम केले होते त्याचे पैसे तर त्यांनी दिले नाहीच, शिवाय मी खास या गाण्यासाठी नृत्य दिग्दर्शन केले होते त्यातील अधिक गोष्टींचा त्यांनी मुळ गाण्यात वापर केला.

सरोज खान यांनी टॉकिंग सिनेमा या व्हिडीओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा आरोप केला आहे. अधिक सांगताना सरोज खान म्हणाल्या, रामलीलाच्या एका गाण्यासाठी मला संजय लीला भन्साळी यांनी बोलावले होते. हे गाणे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रावर चित्रित करायचे होते. दहा दिवस मी या गाण्यावर मेहनत घेतली. याचा व्हिडीओ देखील शूट केला जात होता. या गाण्यात बटन लावणे, कमरेत रूमाल खोचणे, केस पुसणे या सर्व स्टेप्स माझ्या होत्या. मात्र त्यावेळी हे गाणे वेगळे होते.

गाण्याच्या ओळी ‘थप्पडसे डर नही लगता, डर लगता है प्यारसे’ अशा होत्या. दहा दिवसांनंतर अचानक मला या गाण्याची शूटिंग थांबवा असे सांगण्यात आले. याचे कारण देताना ते म्हणाले की, हे गाणे सलमानला आवडले नाही. या गाण्याचे बोल हे दबंगचे असल्याने हे गाणे आपल्याला काढावे लागणार आहे. आम्ही जेव्हा पुन्हा गाणे करू तेव्हा तुम्हाला बोलवू. माझे दहा दिवसाचे पैसे दिलेच नाही. शिवाय मला पुन्हा बोलावलेदेखील नाही. हे गाणे त्यांनी दुसऱ्याकडून करुन घेतले. मात्र माझ्या ज्या स्टेप्स होत्या त्याच प्रियांका चोप्रा नंतरच्या गाण्यात करताना दिसते.

या व्हिडिओमध्ये सरोज खान यांनी यावेळी वरुण धवन संजय दत्तपेक्षा चांगला डान्सर आहे असाही गौप्यस्फोट केला. आलिया पेक्षा माधुरी चांगली नर्तकी आहे असेही त्या म्हणाल्या.