नाटककार शफाअत खान यांचे मत मराठी रंगभूमीला पावणेदोनशे वर्षांची समृद्ध आणि प्रागतिक परंपरा असतानाही राष्ट्रीय स्तरावर मात्र तिच्याबद्दल हेतुत: विकृत व विपर्यस्त कल्पना पसरविल्या जात आहेत. ज्यांना कधी स्वत:चा प्रेक्षक घडवता आला नाही अशा केवळ सरकारी अनुदानांवर नाटके करणाऱ्या अन्यप्रांतीय नाटकवाल्यांनी मराठी नाटके न बघताच हे चित्र निर्माण केलेले आहे. त्यांचा हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी नाटक राष्ट्रीय पातळीवर पोहोचविणे आवश्यक आहे, असे मत यंदाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते नाटककार शफाअत खान यांनी व्यक्त केले. ‘रंगश्री’ संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेल्या आपल्या गुरूंचा- शफाअत खान आणि नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांचा हृद्य सत्कार आयोजित केला होता. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शफाअत खान यांनी हे मत व्यक्त केले. खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात आला. पूर्वी अनुवादाच्या माध्यमातून अन्यभाषिक रंगभूमीशी मराठी नाटकांचे आदानप्रदान होत असे; जे आता थांबले आहे. तेव्हा वसंत देव यांच्यासारख्या उत्तम अनुवादकाकडून मराठी नाटकांचे हिंदी अनुवाद होत असत. आज असे अनुवादक उपलब्ध नसल्याने मराठी नाटके राष्ट्रीय स्तरावर पोहोचत नाहीत. याकरता अनुवादासह विविध मार्गानी मराठी नाटक राष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचे गरज आहे, असे शफाअत खान यांनी सांगितले. विनय सहस्रबुद्धे यांनी हाच धागा पकडून, मराठी रंगभूमीची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी हा एक प्रकल्प समजून त्याकरता आपण सर्वानी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दुसरे सत्कारमूर्ती प्रदीप मुळ्ये यांनी शफाअत खान यांच्या मतास दुजोरा देत असतानाचा मराठी रंगभूमीच्या मर्यादाही कथन केल्या. रोजचे प्रयोग व दौऱ्यांमुळे तांत्रिकदृष्टय़ा मराठी नाटकांत फारसे तांत्रिक ‘प्रयोग’ करण्यास वाव नसतो, असे सांगून ते म्हणाले की, महाराष्ट्रातील नाटय़गृहांच्या मर्यादा आणि सततच्या प्रयोगांचा विचार करूनच नेपथ्याचा विचार करणे भाग पडते. त्यामुळे या मर्यादांचा विचार करूनच नेपथ्यात ‘प्रयोग’ करावे लागतात. असे असले तरीही मराठी रंगभूमी नि:संशयपणे देशातील अग्रणी रंगभूमी आहे यात मला शंका वाटत नाही. सत्कार सोहळ्यानंतर विजय केंकरे यांनी या दोघांची त्यांच्या रंगप्रवासाबद्दल रंगतदार मुलाखत घेतली.