बॉलिवूडचा बादशहा शाहरुखला सिनेसृष्टीमध्ये यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. यावेळी त्याने या २५ वर्षांच्या कारकिर्दीत येणाऱ्या चढ- उतारानंतर तो बादशहा कसा झाला याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या स्ट्रगलबद्दल विचारण्यात आले. याबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला की, ‘लग्नानंतरची पहिली काही वर्षे आमच्यासाठी स्ट्रगलची होती. गौरी आणि मला सिनेसृष्टी नवीन होती. मी सिनेसृष्टीच्या बाहेरील मुलीशी लग्न केले ही समस्या नव्हती. तर सिनेमाचे चित्रीकरणच सकाळी ६ वाजता संपायचे. मला आजही आमच्या लग्नानंतरचे पहिले काही दिवस लख्खं आठवतात. लग्न झाल्यानंतर लगेच पाचव्या- सहाव्या दिवशी आम्ही दोघं मुंबईला आलो होतो. तेव्हा हेमा मालिनी दिग्दर्शन करत असलेल्या त्या सिनेमाचे चित्रीकरण नेमके सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते.’

…आणि ती शाहरुखला म्हणाली, ‘तुला अभिनय येत नाही’

‘सकाळी ६ पर्यंत शूट होतं हे कमी की काय पण त्याचदिवशी नेमकं एक अभिनेता उशिरा आल्यामुळे सकाळी ६ ला संपणारे शूट ८ वाजेपर्यंत चालले होते. त्यावेळी माझ्याकडे मोबाइल फोन नव्हता, तसंच स्वतःची गाडीही नव्हती. त्यामुळे मी गौरीला घेऊन येण्यासाठी एक टॅक्सी बोलावली आणि चित्रीकरणामध्ये वेळ लागणार असल्यामुळेच मी तिला सेटवर बोलावून घेतले. त्या संध्याकाळी गौरीने हातात चुडा भरलेला आणि सुंदरसा ड्रेस घालून ती मला भेटायला फिल्मसिटीमध्ये आली होती. त्यावेळी तिला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माझी वाट पाहावी लागलेली.’

गौरीने एवढा वेळ वाट कशी पाहिली या आठवणींना उजाळा देताना शाहरुख म्हणाला की,’तिच्या आयुष्यात तिने पहिल्यांदाच मुंबई पाहिली होती. मुंबईत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती फिल्मसिटीला आली होती. ती संपूर्ण वेळ दमट आणि कुबट वास येणाऱ्या मेकअप रूममध्ये सकाळपर्यंत बसून राहिली होती. कदाचित तेव्हा तिला कळलं की याचा कितीही राग आला तरी आमचं आयुष्य आता असंच असणार आहे.’
एवढंच बोलून तो थांबला नाही, ‘आम्हा दोघांसाठीही हा सगळाच अनुभव पूर्णपणे वेगळा होता. मी तेव्हा २५-२६ वर्षांचा होतो तेव्हा गौरी २१ वर्षांची होती. तेव्हा आम्ही दोघं एकमेकांसाठी ऑमलेट बनवायचो. ती वर्ष अशीच निघून गेली. लग्नानंतरची दोन वर्षे दिवस रात्र कामातच गेल्यामुळे आमच्या हनीमूनमध्ये अनेक अडथळे आले होते.’

कपिल शर्माने या कलाकारांना ठेवलं ताटकळत?

आपल्या आयुष्याबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला की, ‘त्यानंतर आयुष्यात यश यायला लागलं. आम्ही दोघंही भौतिक गोष्टींना महत्त्व देत नाही. त्यामुळे आता माझं यश हे माझ्या कुटुंबातील एक महत्त्वपूर्ण घटक बनले आहे. माझ्या कुटुंबात माझी एक बायको आहे, तीन मुलं आहेत एक बहिण आहे आणि स्टारडमही आहे. आम्ही सगळे एकत्रच राहतो. माझं स्टारडम हे आता यश आणि अपयशाप्रमाणेच माझ्या कुटुंबाचाच एक भाग बनलं आहे. माझ्या घरातल्यांनीही याचा स्वीकार केला आहे. सहाजणांच्या कुटुंबामध्ये आता सातवा स्टारडमही आहे जो सहाजणांपेक्षा जास्त मोठा आहे.’