सध्या बॉलिवूडमध्ये ‘ब्रेक अप’ आणि ‘पॅच अप’ या चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत असल्या तरी बी टाऊनमध्ये अशा काही जोड्या आहेत की, ज्या जोडी खरचं ‘एक दुजे के लिए..’ बनल्या असल्याचे दिसून येते. यामध्ये मोजक्या जोडप्यांमध्ये शाहरुख खान आणि गौरी खान यांचा समावेश होतो. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी यांच्या संसाराला आज तब्बल २५ वर्षे पूर्ण होत आहेत. शाहरुख खान आणि गौरी यांची प्रेम कहाणी तशी जगजाहीर आहे. पण तब्बल पंचवीस वर्षे उलटल्यानंतरही या जोडीमध्ये प्रेमाचा गंध अजूनही पहिल्या प्रेमासारखाच असल्याचे दिसते. आपल्या पंचवीसाव्या वाढदिवासाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखने गौरीसोबतच्या नात्यासंबधात काही खुलासे केले आहेत. यामध्ये त्याने गौरीसोबतच्या प्रेमाचा उत्साह कायम असल्याच्या रहस्याचा उलगडा केला.

‘चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्यामुळे मी अधिक वेळ गौरीला देऊ शकत नाही.’ पण कामाच्या व्यस्ततेमुळेच आमच्या नात्यामधील आकर्षण अद्यापही नव्या जोडप्याप्रमाणे कायम राहिले असल्याचे तो म्हणाला. आम्ही दोघांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळ ठेवलं असून त्यांना एकत्र करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, असे सांगत मुलांच्या बाबतीत फक्त आम्ही एकत्रित विचार करत असल्याचे शाहरुख म्हणाला. शाहरुखने कॉस्मोपॉलिटिन या इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे सांगितले.

शाहरुख खान सध्या आपल्या आगामी द रिंग चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असून या चित्रपच्या चित्रिकरणानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर तो आपल्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस धमाकेदार पद्धतीने साजरा करणार आहे. दिवाळीमध्ये दरवर्षी शाहरुख खान पार्टीचे आयोजन करतो. यावेळी पार्टीमध्ये डबल धमाका असेल. जवळच्या मंडळींसोबत तो आपल्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा करणार आहे.