नव्वदच्या दशकात चित्रपटातील विविध धाटणीच्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या काही अभिनेत्री आज चित्रपटसृष्टीपासून काहीशा दुरावल्या आहेत. एखाद्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या अभिनेत्री फार क्वचितच प्रसारमाध्यमांसमोर येतात. त्या तुलनेत या अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केलेले अभिनेते आजही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री काजोल, जुही चावला, माधुरी दीक्षित या अभिनेत्री हल्लीच्या दिवसांमधील चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांमध्ये दिसत नाही. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या याच अभिनेत्रींबद्दल किंग खानने त्याच्या एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुख खान म्हणाला की, 'माधुरी, जुही आणि काजोल या फारच सुंदर अभिनेत्री आहेत. मी आज एक स्टार आहे. पण तेही त्यांच्यामुळेच. मी त्यांच्याकडून बरंच काही शिकलो आहे. मला शक्य असेल तेव्हा तेव्हा मी त्यांना माझ्या चित्रपटांमध्ये काम मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो', असे शाहरुख म्हणाला. यापुढे शाहरुखने असेही सांगितले की 'अनेकांना जरी हे एक कलात्मक क्षेत्र वाटत असले तरीही सरतेशेवटी हा एक व्यवसाय आहे', असे त्याने स्पष्ट केले. पुढे शाहरुख म्हणाला की, 'चित्रपट ही एक कला आहे. ही एक विलक्षण, चौकटीबाहेरची, तणावपूर्ण आणि कधीकधी न उमगणारी कला आहे. पण, मोनालिसाच्या स्मितहास्यावर ज्याप्रमाणे अनेकजण भाळले होते त्याप्रमाणे ही कला फक्त वरवर दिसणाऱ्या सौंदर्यावरच अवलंबून नाहीये. चित्रपटाच्या व्यवयायावरच सारे काही निर्धारित असते. बहुतांश प्रेक्षकवर्गातर्फे नव्या जोमाने काम करणाऱ्या काही नव्या चेहऱ्यांना पसंती दिली जाते. प्रेक्षक त्यांची गरज व्यक्त करतात आणि चित्रपट निर्माते ती गरज पूर्ण करतात'. शाहरुखने त्याच्या वक्तव्यातून माधुरी, जुही आणि काजोल यांच्याविषयी केलेले हे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. शाहरुख खान लवकरच 'रईस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.