आपल्या कसदार अभिनयाने सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान अपार कष्ट करून इथपर्यंत पोहोचल्याचे सगळ्यांनाच माहिती आहे. फौजी, सर्कस सारख्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचे वेगळेपण दाखवत त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवला आणि लोकप्रियतेचे शिखर गाठले. हा प्रतिथयश अभिनेता समाजभान राखत वेळातवेळ काढून समाजासाठी काहीनाकाही करतानादेखील दिसतो. नुकतीच त्याने अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या तरुणींची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. प्रत्यक्ष शाहरुख खान भेटणार म्हटल्यावर या मुलींच्या चेहऱ्यावरदेखील आनंदाचे हसू उमटले. या भेटीचे ट्विट शाहरुखने @iamsrk आणि मेक लव्ह नॉट स्कार्स @makeluvnotscars यांनी पोस्ट केले आहे. शाहरुखने एक फोटो ट्विट केला असून रेश्मा, ममता, सपना आणि बसंती या माझ्या सुंदर मैत्रिणींसोबत असा संदेश लिहित भेटीबद्दल त्यांचे आभारदेखील मानले आहेत. तसेच शाहरुखने पूर्ण दिवस दिल्याबद्दल मेक लव्ह नॉट स्कार्स संस्थेनी त्याचे आभार मानले असून शाहरुखच्या बेटीने भारावून गेल्याने हा दिवस त्यांच्याही कायम लक्षात राहील, असे संस्थेनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आपण पुन्हा एकदा भेटायला येऊ आणि जास्त वेळ घालवू, खास करून ममताची रोमॅन्टिक शायरी ऐकायला, असे प्रत्युत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये शाहरुखने म्हटले आहे. मेक लव्ह नॉट स्कार्स ही संस्था अॅसिड हल्ला झालेल्या महिलांसाठी काम करणारी सामाजिक संस्था आहे. , शाहरुखला भेटलेल्या मुलींपैकी रेश्मा कुरेशी या १९ वर्षीय युवतीने अॅसिड हल्ला झालेल्या तरुणींना धैर्याचा संदेश देण्यासाठी न्यूयॉर्कमधील फॅशनवीकमध्ये सहभाग घेतला होता. एफटीएल मोडा या फॅशन उत्पादन कंपनीने हा अभिनव उपक्रम राबवला होता. रॅम्प वॉक करताना भारतीय डिझायनर अर्चना कोच्चर यांनी तयार केलेला मोठा गाऊन रेश्माने परिधान केला होता. रॅम्पवर तिचे आगमन होताच उपस्थितांनी तिला भरभरून दाद दिली. जीवन बदलून टाकणारा हा अनुभव असल्याची भावना तिने यावेळी बोलताना व्यक्त केली होती. छायाचित्रकारांनी तिच्या भोवती गराडा घतला होता. या क्षणाला आपल्याला खूप चांगले वाटत असून, अॅसिड हल्ल्यात वाचलेल्यांच्या कहाण्या अत्यंत महत्वाच्या असल्याचे सांगते, तेसुध्दा सर्वसाधारण जीवन जगू शकतात हाच संदेश आपल्याला यातून द्यायचा असल्याचे ती म्हणाली होती. पुस्तकाचे मूल्यमापन मुखपृष्ठावरून करू नका. लोकांनी आम्हाला कमकुवत समजू नये. आम्हीसुध्दा बाहेर पडून सगळ्या गोष्टी चारचौघांसारख्या करू शकत असल्याचेदेखील तिने सांगितले. २००४ मध्ये कुरेशीच्या दिराने तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. धैर्य खचू न देणारी रेश्मा भारतातील अॅसिड हल्ला पीडितांसाठी ती धीराचा आवाज बनली.