मराठीतला पहिला हॉररपट ‘कनिका’ ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता शरद पोंक्षे यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या  निमित्ताने पोंक्षे यांच्याशी केलेली बातचीत…

प्रश्न- आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटांतून काम केलं. या चित्रपटाचं वेगळेपणाविषयी काय सांगाल?
शरद पोंक्षे – आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीतील चित्रपटांमध्ये ‘कनिका’ नक्कीच वेगळा चित्रपट ठरला आहे. मराठीतला पहिला हॉररपट हे ‘कनिका’चं वेगळेपण सांगता येईल. केवळ हॉररपट एवढ्यापुरतंच या चित्रपटाचं वेगळेपण मर्यादित नाही, तर अत्यंत परखड, जबरदस्त असं सामाजिक भाष्य या चित्रपटातून करण्यात आलं आहे.

प्रश्न- चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल ?
शरद पोंक्षे- या चित्रपटात माझी डॉक्टरची भूमिका आहे. कनिका डॉक्टरच्या आयुष्यात कशी येते आणि त्यानंतर डॉक्टरचं जगणं बदलून जातं हे यात तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत थरारक असा अनुभव या चित्रपटातून मिळणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटातून सामाजिक भाष्य करण्यात आलं असलं, तरी ते प्रचारकी आव आणून केलेल नाही.

प्रश्न- स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. तरीही अशा अनेक घटना घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर हा चित्रपट कसा वेगळा ठरेल?
शरद पोंक्षे- स्त्री भ्रूण हत्या हे घृणास्पद कृत्य आहे. हे कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवं. मात्र, आपल्याकडे पैशाने सगळंच विकत घेता येतं असं चित्र आहे. अनेक घटना घडतात आणि त्यातले दोषी मोकाट सुटतात. त्यामुळे न्यायव्यवस्था आहे की नाही असं वाटू लागतं. मुल ऐकत नाही म्हणून एखादी आई भीती दाखवते आणि त्यानंतर ते मूल शांत होतं. त्याचप्रकारे या चित्रपटातून समाजाला भीती दाखवण्याचा एक प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट पाहून स्त्री भ्रूण हत्या करणारा एखादा माणूस थांबला, तरी शंभर कोटींचा व्यवसाय केल्याइतकं यश मिळालं असं मी मानतो.

प्रश्न – प्रथमच दिग्दर्शन केलेल्या पुष्कर मनोहर यांच्यासह काम करण्याचा अनुभव कसा होता?
शरद पोंक्षे- दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांच्यासह काम करताना खूप मजा आली. त्यांना नेमकं माहिती होतं आपल्याला चित्रपटातून काय सांगायचं आहे. त्याची त्यांनी पूर्वतयारी केली होती. चित्रपटाच्या उच्च निर्मिती मुल्यांसाठी त्यांनी काहीही कसूर केलेली नाही. काहीवेळा अडचणींचा सामना करावा लागला. त्याबद्दल सांगायचं झालं, तर मे महिन्यात आम्ही शूटिंग करत होतो आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. काहीही काम करता येत नव्हतं. रात्रभर आम्हाला बसून रहावं लागलं. पुष्कर यांनी अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळली आणि राहिलेलं काम पूर्ण केलं. त्यांनी अतिशय विचारपूर्वक हा चित्रपट साकारला आहे. डॉल्बी साऊंड, सिनेमास्कोप अशा उत्तम तंत्रज्ञानाचा वापर चित्रपटासाठी केला आहे.