देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतरच्या घडामोडींवर आधारित ‘३१ ऑक्टोबर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सत्य घटनेवर आधारीत या सिनेमात सोहा अली खान आणि वीर दास यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दोन शिख अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली होती. या हत्येनंतरच्या २४ ते ३६ तासांत एका शिख कुटुंबाला कुठल्या स्थितीतून जावे लागले, हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. चार महिन्यांची प्रतीक्षा आणि नऊ सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री लागल्यानंतर आता या सिनेमाला हिरवा कंदील दिला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेचा दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील याचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा येत्या ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमाचे लेखन हॅरी सचदेवा यांनी केले आहे. हॅरी यांनीच या सिनेमाची निर्मितीही केली आहे.
यातले हिंसा आणि रक्तपात दाखवणारी अनेक दृश्ये कापण्यात आलीत. हे दृश्ये विशेष जाती-धर्माच्या लोकांच्या भावना दुखावू शकतात, असे सेन्सॉर बोडार्चे मत होते. त्यामुळे ही दृश्ये काढून टाकण्यात आली.