सलमान खान याच्या ‘दबंग’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सोनाक्षी सिन्हाने सांगितलं की हा सिनेमा तिच्यासाठी नेहमीच खास राहिला आहे. या सिनेमामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. बॉलिवूडमध्ये सध्या ‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षी सिन्हा काम करत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली त्याच सिनेमाच्या पुढील भागात ती नसणार अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
यावर बोलताना ती म्हणाली की, ‘मी जे काही आहे ते या सिनेमामुळे आहे. ‘दबंग’मुळेच माझी खरी ओळख निर्माण व्हायला मदत झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला सिनेमा आहे. त्यामुळे ‘दबंग’ सिनेमा आणि टीम यांच्या सगळ्यांच्याच जवळ आहे. त्यामुळे या सिनेमाच्या कोणत्याही भागात माझी गरज पडली तर मी केव्हाही तयार आहे. अगदी पाहुणी कलाकार म्हणूनही काम करण्याची माझी तयारी आहे.’
पुढे ती म्हणते की, ”दबंग ३’ ची संहिता अजून तयार झालेली नाही. संहितेवर अजूनही काम केलं जात आहे. पण, ‘दबंग’च्या तिसऱ्या सिनेमात ही रज्जो ही व्यक्तिरेखा कायम राहणार. तिसऱ्या भागात तुम्ही अचानक व्यक्तिरेखा बदलू नाही शकत. असे असले तरी कथानकाच्या गरजेनुसार सिनेमात काही व्यक्तिरेखा कमी होऊ शकतात तर काही वाढूही शकतात. पण जर संहितेमध्ये रज्जोची व्यक्तिरेखा असेल तर ती मीच करणार.’
सध्या ‘दबंग ३’च्या संहितेवर काम चालू असल्यामुळे इतर कोणत्याच गोष्टींवर बोलणी सुरु झाली नाहीएत. त्यामुळे आत्ताच या संदर्भातले तर्क लावणं चुकीचं ठरेल. एकदा का संहिता तयार झाली तर अरबाज खान स्वतःच त्याच्याबद्दल घोषणा करेल.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दबंग ३’ डिसेंबर २०१७ मध्ये प्रदर्शित होईल. टाइम्स ऑफ इंडियाला अरबाज खानने दिलेल्या मुलाखतीत त्याने दबंग ३ मध्येही सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा हेच मुख्य पात्र असतील असे म्हटले आहे. या दोघांशिवाय सिनेमात दुसऱ्या व्यक्तिरेखाही असतील असेही तो या मुलाखतीत म्हणाला. या इतर व्यक्तिरेखांबद्दल मात्र एकदा संहिता तयार झाल्यावरच बोलणे योग्य ठरेल असे ते म्हणाले. सोनाक्षीशिवाय सिनेमात दुसरी अभिनेत्री असण्याचीही शक्यता आहे.