बॉलिवूडची क्विन कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘रंगून’ या चित्रपटाची प्रसिद्धी फार जोरात करत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नुकतीच कंगनाने सुगंधा मिश्रा सूत्रसंचालक असलेल्या ‘द वॉइस ऑफ इंडिया किड्स’ या रिअॅलिटी शोच्या सेटवर उपस्थिती लावली होती. यावेळी तिच्यासोबत चित्रपटातील अभिनेता शाहिद कपूर हा देखील उपस्थित होता. या कार्यक्रमानंतर सुगंधा मिश्रा आणि कंगना या दोघींच्यात तणाव निर्माण करणारी घटनेची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. सुगंधाने ‘द वॉइस ऑफ इंडिया किड्स’ या शोमध्ये कंगनाची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र सुगंधाची गंम्मत कंगनाच्या फारच मनाला लागल्याचे दिसले. त्यामुळेच तिने सुगंधाला कानशिलात मारण्याचे वक्तव्य व्यासपीठावर केले. यावर सुगंधाने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने जे काही मला मारण्याचे वक्तव्य केले, तो प्रकार चित्रीकरणाचा एक भाग होता, आम्ही व्यासपीठावर परिक्षकांनी दिलेल्या टास्कचा खूप आनंद घेतला, असे स्पष्टीकरण देत सुगंधाने कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘द वॉइस ऑफ इंडिया किड्स’ या कार्यक्रमात कंगना आणि शाहिदच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे परिक्षक असलेल्या सलीम मर्चंट आणि शान यांनी कंगनासमोर तिची नकल करून दाखवण्याचे आव्हान सुगंधाला दिले होते. त्यावेळी शान आणि सलीमने दिलेले आव्हान स्वीकारत सुगंधाने कंगनाची नकल केल्याचे पाहायला मिळाले. सुगंधाने केलेली नकल कंगनाला काही आवडली नाही आणि तिने रागात ‘मला हिच्या कानशिलात लगावण्याची इच्छा आहे,’ असे म्हटले होते. पण, शोची सूत्रसंचालक असल्यामुळे सुगंधाने तिचे म्हणणे जास्त मनावर न घेता कार्यक्रम पुढे तसाच चालू ठेवला. कंगनाच्या या वक्तव्यानंतर सेटवर उपस्थित असलेले सर्व लोक चकित झाले होते. मात्र सुगंधाने हा एक कार्यक्रमाचा भाग होता असे म्हणून कंगनाच्या वक्तव्य मनाला लागणारे नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुगंधा जरी हा चित्रीकरणाचा भाग असल्याचे म्हणत असली तरी कार्यक्रमावेळी कंगनाच्या वक्तव्यानंतर सुगंधाच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता हे नाकरता येणारे नाही. कंगनाच्या वक्तव्यावर सुगंधाने दिलेली प्रतिक्रिया ही खिलाडी वृत्तीचे दर्शन करणारी आहे असेच म्हणावे लागेल. काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहरुख खानने सुगंधाच्या नृत्यावर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले होते. सुगंधा वाईट कलाकार असून तिने नृत्य करणे टाळले पाहिजे असे शाहरुख म्हणाला होता. बॉलिवूड बादशहाच्या या वक्तव्यानंतर सुगंधाच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले. तिच्या डोळ्यातील आश्रू पाहून आपण जे काही बोललो तो केवळ एक प्रॅन्क होता. असे तो म्हणाला होता.