मालिका हे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजनाचं साधन आहे. लोकांचं मनोरंजन करणाऱ्या या कलाकारांनाही त्यासाठी बराच घाम गाळावा लागतो. प्रसिद्ध व्हायला कोणाला नाही आवडत. पण प्रसिद्ध होण्याची एक किंमतही असते. टिव्ही मालिकेच्या कलाकारांना ती किंमत अथक मेहनतीतून मोजावी लागते. कलाकारांना जरी त्यांच्या कामाचे भरपूर पैसे दिले जात असले तरी त्यांच्या कामाचं स्वरूप बऱ्याच मेहनतीचं असतं. त्यांच्यासाठी कामाचे वाढलेले तास हा एक मुख्य त्रास असतो आणि त्यामुळे बऱ्याचदा कलाकार मालिकाही सोडतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एपिसोड असतील तर तेवढा त्रास होत नाही. पण जर डेलिसोप असेल तर मात्र कलाकारांची अगदीच हालत होते. अशीच हालत सध्या 'अंजली' मालिकेतील सुरुची अडारकरची झालीये. सोमवारपासून सुरु झालेल्या मालिकेच्या काही दृश्यांचे शूटिंग वेळेअभावी पूर्ण झाले नव्हते. सकाळी ९ वाजता सुरु झालेली शिफ्ट साधारणतः रात्री ९ ला म्हणजेच १२ तासांनी संपते. मात्र, काही तांत्रिक गोष्टींमुळे एपिसोडचं पूर्ण बँकिंग वेळेत तयार झालं नव्हतं. याचं महत्त्व सुरुचीला नीट समजत असल्यामुळे यातून मार्ग काढण्याची जबाबदारी तिनेच स्वीकारली. मालिकेच्या एपिसोडचे जास्तीत जास्त बँकिंग व्हावे यासाठी सुरुची जोमाने कामाला लागली. गेल्या आठवड्यात पूर्ण उत्साहाने तिने चक्क ८४ तास काम केलं. तिची ही मेहनत बघून दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आणि तिचे इतर सहकलाकारसुद्धा भारावून गेले. सुरुची 'अंजली'च्या भूमिकेत इतकी समरस झाली की सेटवर सगळेच तिला 'तुफानी अंजली' या नावाने हाक मारतात. आता तिची ही मेहनत प्रेक्षकांच्या मनाला किती भिडते हे मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून कळेलच. दरम्यान, शिवराज आणि शिवानी यांच्या अभिनयाने सजलेली 'बन मस्का' मालिका आता एका नवीन वेळेवर दाखवण्यात येणार आहे. ही मालिका आधी सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता दाखवली जात होती. मात्र, २२ मे पासून या वेळेवर सुरुची अडारकर आणि हर्षद अतकरी यांची हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारी 'अंजली' ही नवीन मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे 'बन मस्का' आता तुम्हाला रात्री १० वाजता पाहता येणार आहे.