विनोदवीर कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आला आहे. सुनील ग्रोवर आणि कपिलमध्ये झालेल्या वादानंतर या सर्व प्रकरणाचे पडसाद ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमावर उमटताना दिसत आहेत. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातील हुकमी एक्के समजल्या जाणाऱ्या सुनील ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी कपिलच्या शोवर येण्यास नकार दिल्यामुळे या शोचे अस्तित्त्व धोक्यात असल्याचे म्हटले जात होते. नुकतेच कपिलच्या या शो चे काही भाग प्रदर्शित झाले. पण, सुनील ग्रोवर आणि कार्यक्रमातील इतर विनोदवीरांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर हवी तशी छाप पाडली नाही. ‘नाम शबाना’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता मनोज बाजपेयी आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी कपिलच्या शो मध्ये हजेरी लावल्यानंतर त्यापुढील भागासाठी कपिलने टेलिव्हिजन विश्वातूनच नावारुपास आलेल्या काही विनोदवीरांना आमंत्रित केले होते.

विनोदवीर राजू श्रीवास्तव, सुनील पाल आणि एहसान कुरेशी यांच्या उपस्थितीत कपिलने परिस्थिती सावरुन नेण्याचा प्रयत्न केला खरा. पण, त्यातही तो सपशेल अयशस्वी ठरला. या तिन्ही विनोदवीरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भागाची सुरुवात कपिलने त्याच्या शैलीत केली. त्यानंतर त्याने व्यासपीठाचा सर्व ताबा राजू श्रीवास्तवकडे सुपूर्द करत तो थेट नवज्योत सिंग सिद्धूंच्या शेजारी जाऊन बसला. राजू श्रीवास्तवनेही त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्याही वाट्याला अपयशच आले. राजू मागोमाग सुनील पाल आणि एहसान कुरेशी यांनीही विनोदी खेळी केली. पण, प्रेक्षकांच्या अपेक्षा कोणालाही पूर्ण करता आल्या नाहीत. नेहमी ‘डॉ. मशहूर गुलाटी’ म्हणजेच सुनील ग्रोवरच्या एन्ट्रीला होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांचा कल्ला या कार्यक्रमाच्या भागात कुठेच पाहायला मिळाला नाही.

किकू शारदा, रोशेल राव आणि खुद्द कपिल शर्मा यांची उपस्थिती असतानाही ही मंडळी काही प्रेक्षांची मनं जिंकू शकली नाहीत. त्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनील ग्रोवरची जागा कोणीच घेऊ शकत नाही असेच चित्र दिसतेय. विमान प्रवासादरम्यान आपल्या बेजबाबदार आणि उद्दाम वागण्यामुळेच कपिलला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता त्याचा फटका कपिलला आणि पर्यायाने सोनी टेलिव्हिजन वाहिनीला बसत असल्याचे दिसते.

https://www.instagram.com/p/BRhs7fxFrk0/