चित्रपट हीट होण्याचे कोणतेही सूत्र नसते. हल्ली वाईट चित्रपट देखील सुपरहीट होतात, तर कधी चांगले चित्रपट जोरदार आपटतात. त्यामुळे माझ्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीतील अनुभवानुसार प्रत्येक चित्रपट हा त्याचे नशीब त्याच्यासोबतच घेऊन येतो, असे विधान बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याने केले आहे.

प्रत्येकाला आशयघन चित्रपट तयार करायचा असतो. ‘मुघले आजम’ची बरोबरी साधणारा चित्रपट तयार करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो, पण ते शक्य नाही, असे अक्षय म्हणाला.

अभिनयासाठी सोयीस्कर ठरणाऱया चित्रपटांबाबत विचारले असता अक्षयने विनोदी आणि अॅक्शनपटात काम करणे सोपे असल्याचे सांगितले, पण त्यासोबतच आव्हानात्मक भूमिका  साकारण्यातून मला आनंद मिळतो, असे देखील तो पुढे म्हणाला.

अक्षयचा ‘एअरलिफ्ट’ हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार असून यात तो कुवेतस्थित भारतीय व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे.