झी मराठी वाहिनीवर सोमवार, ३ ऑक्टोबरपासून ‘तुझ्यात जीव रंगला’ ही नवी मालिका सुरू होत आहे. कोल्हापूरचा माणूस म्हटला की तांबडय़ा मातीतील रांगडा गडी डोळ्यासमोर येतो. या रांगडेपणालाही प्रेमाची झालर असते. रांगडेपणातील हळुवार प्रेमाची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. सोमवार ते शनिवार या दिवशी रात्री साडेसात वाजता मालिकेचे प्रसारण होणार आहे. पैलवान गडी ‘राणा’ आणि त्याच्या प्रेमात पडलेली ‘अंजली’ यांची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून राणा व अंजली या दोन्ही भूमिकांमध्ये अनुक्रमे हार्दिक जोशी व अक्षया देवधर हे नवोदित कलाकार आहेत. मालिकेची कथा, पटकथा सुबोध खानोलकर, तर संवाद तेजेश घाडगे यांचे आहेत. सोबो फिल्म्स प्रा. लिमिटेडची निर्मिती असलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन निरंजन पत्की यांनी केले आहे.