तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कोल्हापूरचा मर्द राणादा आणि अंजलीबाईंनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. कमी कालावधीतच राणादा आणि अंजलीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या दोघांचं नुकतंच लग्न झालं. पण, लग्नानंतर राणाने आपल्या संसाराची सुरुवात शेतातील घरात करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याच्या या निर्णयामागे वहिनीचं कारस्थान होतं ज्याला राणा बळी पडला होता. राणाने थोरल्या सुनबाईसह घरी परतावं यासाठी राणाचे आबा प्रतापराव आणि गोदाक्का दोघेही विविध प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला आता यश येणार असून राणा आणि अंजली गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी म्हणजेच गायकवाडांच्या वाड्यावर परतणार आहेत. मालिकेतील या नव्या वळणाबद्दल राणा म्हणतो की, लग्नानंतरचा हा आमचा पहिलाच गुढीपाडवा आहे. आमच्या संसाराची सुरुवातच एका वेगळ्या प्रकारे झाली. आमचं राहतं घर सोडून मी अंजलीबाईंना घेऊन शेतातील घरात संसार सुरु केला होता आणि त्यांनी तिथेही माझी साथ दिली. आम्ही घरी परत यावे ही सर्वांचीच इच्छा होती आणि या गुढीपाडव्याला ती पूर्ण होणार आहे. मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर आम्ही घरी परतणार आहोत. माझ्यासाठी आबांचा आणि गोदाक्काचा आनंद महत्त्वाचा आहे. एकत्र कुटुंबात राहण्याची अंजलीबाईंचीसुद्धा इच्छा होती त्यांची इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. या सगळ्यात कुणीच दुखावणार नाही याचीही काळजी मला घ्यायची आहे आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. या गृहप्रवेशाबद्दल अंजली म्हणते की, लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहणं हे कोणत्याही मुलीचं स्वप्न असतं. आता या गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझंही हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मला घरातील सर्व लोकांची काळजी घ्यायची आहे आणि सर्वांना प्रेम द्यायचं आहे. एक थोरली सून म्हणून सर्वांच्या माझ्याकडून खूप सा-या अपेक्षा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ सह ‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेलाही नवं वळण मिळणार आहे.