उर्दू शायर, कवी आणि गीतकार नक्श लायलपूरी यांचे रविवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अंधेरीतील निवासस्थानी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओशिवारामधील स्मशानभूमीत लायलपूरी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतामधील गावात नक्श लायलपूरी यांचा जन्म झाला होता. लायलपूरी यांचे मूळ नाव जसवंत राय शर्मा असे होते. १९४० च्या दशकात नक्श लायलपूरी हे हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी मुंबईत आले. १९५२ मध्ये त्यांना पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे ते गीतकार होते. मात्र तब्बल १८ वर्षांनी लायलपूरी यांना प्रसिद्धी मिळू लागली. मुंबईत आल्यावर लायलपूरी यांना खडतर प्रसंगांचा सामना करावा लागला. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांनी काही दिवस डाक विभागातही काम केले. हिंदी सिनेसृष्टीतील त्यावेळचे आघाडीचे दिग्दर्शक, संगीतकार आणि गायकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. रॉमेंटिक आणि भावूक गाण्यांनी लायलपूरी यांनी संगीतप्रेमींची दाद मिळवली होती.

मे तो हर मोड पर, ना जाने क्या हूआ जो तुने छू लिया, दो दिवाने शहर मे अशा एका पेक्षा एक गाण्यांनी त्यांनी रसिकांच्या मनात स्थान पटकावले होते. १९९० च्या दशकात लायलपूरी यांनी सिनेसृष्टीतून निवृत्ती स्वीकारली होती. यानंतर त्यांनी मालिकांसाठी गाणी लिहायला सुरुवात केली होती. २००५ – ०६ च्या सुमारास त्यांनी ताजमहाल या चित्रपटातून पुनरागमन केले होते.