सोशल मीडियावर सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारं एक माध्यम म्हणजे ट्विटर. विविध अॅप्स आणि नव्या तंत्रज्ञानाच्या दुनियेमध्ये ट्विटर नेहमीच आघाडीवर आहे. कोणत्याही गोष्टीच्या हॅशटॅगपासून ते अगदी सतत बदलत राहणाऱ्या ट्रेंड आणि ट्विटपर्यंतची सर्व माहिती ट्विटरच्याच माध्यमातून अनेकांसमोर उघड होते. बरेच जगप्रसिद्ध सेलिब्रिटी आणि नामवंत व्यक्तिसुद्धा ट्विटर द्वारे विविध विषयांवर त्यांची मतं मांडत असतात. अशाच या ट्विटरच्या माध्यमातून दरवर्षी ‘द गोल्डन ट्विट ऑफ द इयर’ या उपक्रमाअंतर्गत सर्वात जास्त प्रमाणात रिट्विट करण्यात आलेल्या ट्विटची निवड करण्यात येते.

यासाठी विराट कोहलीच्या एका ट्विटला ‘द गोल्डन ट्विट ऑफ द इयर’ ठरविण्यात आले आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्का शर्माची पाठराखण करणारं ट्विट केलं होतं. टी-20 विश्वचषकामधील भारत – ऑस्ट्रेलिया सामन्यातील विजयानंतर सोशल मीडियावर अनुष्काची खिल्ली उडवली जात होती. यावरुन विराट कोहलीने संताप व्यक्त करत अनुष्काची बाजू घेत टीकाकारांना उत्तर दिलं होतं. त्याचं हेच ट्विट 40 हजाराहून जास्त वेळा रिट्विट करण्यात आलं आहे. विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही ‘शेम’ असा एक फोटो पोस्ट करत त्यासोबत अनुष्काची पाठराखण करणारे कॅप्शन लिहीले होते.

पाहा: VIDEO- ‘गुरनाल इश्क..’वर अनुष्का-विराट थिरकतात तेव्हा

कोहलीने केलेले हे ट्विट पाहता त्याची निवड ‘द गोल्डन ट्विट ऑफ द इयर’ म्हणून होणे ही एक प्रशंसनीय बाब आहे. यावर्षी विराट कोहलीने अनुष्काने केलेलं ट्विट 40 हजाराहून जास्त वेळा रिट्विट करण्यात आलं असून एक लाखाहून जास्त लाईक्सही मिळाले आहेत. ‘अनुष्काला लक्ष्य करणा-यांनो थोडी शरम बाळगा’. अनुष्काकडून मला नेहमीच सकारात्मकता शिकायला मिळाली आहे’, असे टि्वट करुन विराटने सोशल टीकाकारांना उत्तर दिले होते. टी-20 विश्वचषक सामन्यादरम्यान काही कारणांमुळे अनुष्कासोबत प्रेमसंबंध तुटल्यामुळेच विराट अफलातून कामगिरी करत असल्याचे मेसेज सोशल मीडीयावर फिरत होते. या मेसेजेसमध्ये विराटला वर्ल्डकप विजयापर्यंत अनुष्कापासून दूर रहाण्याचा सल्लाही दिला जात होता. त्यादरम्यान या दोघांच्या नात्यात दुरावाही आला होता. मात्र विराटने एका महिलेची अशाप्रकारे खिल्ली उडवणं अयोग्य असल्याचं म्हणत त्याचं ठाम मत मांडलं होतं. ज्याला त्याच्या फॉलोअर्स आणि नेटिझन्सनीही प्रतिसाद देत योग्य असल्याचं दाखवून दिलं.

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा एकत्र आले असून सध्या ते एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करत आहेत. काही दिवसांपूर्वीच युवी आणि हेजल किचच्या विवाहसोहळ्यामध्ये विराट आणि अनुष्का एकत्र गेले होते. या लग्नसोहळ्यामध्ये विराट-अनुष्का पंजाबी गाण्यावर थिरकले सुद्धा. इतकेच नव्हे तर, बॉलिवूडमधील विविध पार्ट्यांनाही हे जोडपे आता हजेरी लावत आहेत. त्यामुळे येत्या काळात विराट आणि अनुष्काच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.