बॉलिवूडमध्ये एका मोठ्या परिवारात जन्म घेतलेल्या संजय दत्तने आयुष्यात एवढ्या गंभीर चुका केल्या आहेत की त्याच्यामुळे दत्त कुटुंबियांना अनेकदा शरमेने मान खाली घालावी लागली असेल. पण तुम्हाला वाटत असेल की, फक्त तारुण्यातच जर त्याने असे काही केले असेल असं वाटत असेल तर तुम्ही जरासे चुकताय. लहानपणीही त्याने अशा काही गोष्टी केल्या, ज्याने दत्त कुटुंबियांना शरमेने मान खाली घालावी लागली होती.

स्वतः संजूने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो आपल्या आई-वडिलांसोबत लंडनला गेला होता तेव्हा तिथे त्याला एक गोष्ट फार आवडली होती. ती गोष्ट अनेकदा मागूनही सुनील दत्त यांनी ती दिली नव्हती. तेव्हाच नर्गिस आणि सुनील यांना एका मीटिंगसाठी जायचे होते, त्यामुळे वेळेत पोहोचायला हवे म्हणून त्यांनी लवकर खरेदी संपवली होती.

पण संजयच्या डोक्यातून ती गोष्ट गेली नव्हती. म्हणून जेव्हा सुनील आणि नर्गिस मीटिंगला पोहोचले आणि तिथे उपस्थित लोकांना आपल्या कुटुंबाचा परिचय करुन देऊ लागले तेव्हा संजयने तिथे सगळ्यांसमोर जमीनीवर आपले डोकं आपटायला आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. त्याचे असे वागणे पाहून तिथे उपस्थितांना आश्चर्य वाटले. एवढेच काय तर मीटिंगसाठी भेटलेल्यांनी ती मीटिंगच रद्द करुन टाकली होती.

परदेशात झालेल्या या घटनेमुळे नर्गिस यांना एवढे अपमानास्पद वाटले की त्यांनी लंडनमध्ये उरलेल्या दिवसांची सुट्टीही रद्द केली. संजय दत्त याने सांगितले की, त्याच्या एका अयोग्य वागणुकीमुळे त्याच्या कुटुंबाची संपूर्ण ट्रीप वाया गेली होती. असे असले तरी संजयला त्याच्यामुळे कुटुंबियांना जे दुःख सहन करावे लागले त्या सर्वच गोष्टींचा पश्चाताप आहे.

दरम्यान, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर संजय दत्त सिनेमा निवडताना काळजी घेताना दिसत आहे. यामध्ये तो विनोद चोप्रा आणि सिद्धार्थ आनंद यांच्या सिनेमात देखील काम करताना दिसणार आहे. तसेच संजय दत्त मराठी आणि हिंदी सिनेमाच्या निर्मितीमध्येही सहभागी होताना दिसत आहे.  सध्या संजय फक्त भूमी या त्याच्या आगामी सिनेमामुळेच चर्चेत आहे असे नाही तर त्याच्यावर येणाऱ्या आत्मचित्रपटामुळेही तो चर्चेत आहे. या आत्मचरित्रात संजयची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.