अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा काही दिवसांपासून त्याच्या पानमसालाच्या जाहिरातीवरून चर्चेत होता. या जाहिरातीत अक्षयसोबत अजय देवगण (Ajay Devgn) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) देखील दिसले होते. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर त्याने सगळ्यांची माफी मागितली. यासगळ्यात एक नेटकऱ्याने चुकून अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांना अजय देवगण समजून गुटख्याच्या जाहिरातीचा पोस्टर शेअर करत त्यांना टॅग केले. त्याविषयी सुनील शेट्टी यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.

मुंबईतील जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात सुनील शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी या गुटख्याच्या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. “माझ्या नावाने कोणीतरी ट्वीट केले होते की, तुम्ही भारत देशाला खराब करत आहात, मुलांना चुकीची शिकवण देत आहात, कॅन्सर इंडिया बनवत आहात… तर त्याने चष्मा लावला होता म्हणून मी त्याला म्हणालो, बेटा चष्मा बदल किंवा नंबर बदल. कारण मी त्या पोस्टरमध्ये नाही हे तुला दिसत नाही. मी त्याला बेटा किंवा भाऊ म्हणालो. माझा एकच सल्ला आहे. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. मी जास्त गोड खात नाही, मी जास्त जेवत नाही. याचा अर्थ मी बरोबर आणि इतर चूक, असे मी म्हणू शकत नाही”, असे सुनील शेट्टी म्हणाले.

आणखी वाचा : “दिघे साहेब गेले तेव्हा अख्खं ठाणं जळत होतं अन्…”, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : “मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राज ठाकरेंनी…”, दीपाली सय्यद यांचे ट्वीट चर्चेत

ते पुढे म्हणाले, “तंबाखू विकत घेतात म्हणून त्याची जाहिरात केली जाते. जे त्याचं सेवन करत नाहीत ते दूर राहतात, मीही दूर राहिलो. चित्रपटसृष्टीत बरेच काही घडते, ज्यापासून मी स्वतःला दूर ठेवतो. याचा अर्थ मी देव किंवा संत नाही. माझ्यातही अनेक दोष आहेत, त्यामुळे मला या सर्व गोष्टींवर भाष्य करायला आवडत नाही.”