जगाच्या प्रभावापासून साधक निर्लिप्त झाला की समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे।।’’ जगाच्या पकडीतून, जगाच्या बंधनातून त्याची वृत्ती मोकळी होते, स्वतंत्र होते. जशी वृत्ती तसं आचरण घडतं. जगाच्या आसक्तीनं बरबटलेली वृत्ती ही जगाच्या द्वंद्वलयीत अखंड गुंतवते. जेव्हा जगाचं खरं स्वरूप उकलू लागतं, जगाशी आपला असलेला संग कोणत्या क्षणी संपेल, याची शाश्वती नसल्याचं उमगू लागतं तेव्हा त्या जगाच्या प्रभावातून मन मोकळं होऊ लागतं. जगाबाबत ते उदासीन होऊ लागतं. आपण का जन्मलो, माणसाच्याच जन्माला का आलो, या मनुष्य जन्माचा काही हेतू आहे का, हे प्रश्न मनात उद्भवतात. त्यातून मनावरचा जगप्रभावच क्षीण होत असतो. तेव्हा सत्क्रिया, भक्ती, नित्यनेम, उपासना हे सारं जगाच्या प्रभावाचा जो वज्रलेप अंत:करणावर चढला आहे तो खरवडून काढण्यासाठी आहे. त्यामुळे साधनेच्या मार्गावर वळतानाच जगाचं खरं स्वरूप, जगाचं खरं मूल्य उमगलं पाहिजे. जगाचीही ओढ आहे आणि भगवंताचीही ओढ आहे, हे होऊ शकत नाही! मात्र खरं औदासीन्य आलं नसतानाच साधक या मार्गावर पाऊल टाकतो आणि त्याचा परमार्थही वेगळ्या अर्थानं प्रपंचच होतो. अधिकच घातक होतो. याबाबत समर्थ आता मनोबोधाच्या ५८व्या श्लोकापासून सावध करीत आहेत. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू आणि मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :नको वासना वीषईं वृत्तिरूपें। पदार्थी जडे कामना पूर्वपापें। सदा राम नि:काम चिंतीत जावा। मना कल्पनालेश तोही नसावा ।। ५८।। प्रचलित अर्थ : उदासीनता नसेल तर मनोवृत्तीचा सारा ओघ विषयांकडेच वाहत जातो. पूर्वपापामुळे जड व नश्वर पदार्थाच्या ठिकाणी वासना लोलुप होऊन जडत असते. म्हणून हे मना, विषयवृत्तीचा म्हणजेच कल्पनेचा लेशही चित्तात न ठेवता रामाचे निष्कामबुद्धीने चिंतन करीत जा. आता मननार्थाकडे वळू. समर्थ सांगत आहेत की जगाबाबत खरं औदासीन्य आलं नसेल, जग हाच अखंड सुखाचा खरा एकमात्र आधार आहे, अशी सुप्त मनोधारणा पूर्ण पुसली गेली नसेल, तर मग भक्तीमार्गाकडे वळूनही मनातून माणूस जगाचीच भक्ती करीत राहातो! मग रामाची निष्काम नव्हे तर सकाम भक्तीच होऊ लागते. माझं भौतिक जीवन सदोदित सांभाळलं जावं, माझ्या भौतिक जीवनात कधीही हानी होऊ नये, मला कायम सुखच सुख मिळावं, मला कुणाचाही कधीही विरोध होऊ नये, माझ्या इच्छापूर्तीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत, मला आवडत्या व्यक्तींचा कधीही वियोग होऊ नये, आवडत्या व्यक्तींशी मैत्र अखंड टिकावं, त्यांच्याशी कधीही मतभेद वा त्यांच्या बाजूनं मानसिक दुरावा निर्माण होऊ नये; अशा तऱ्हेच्या अनंत कामना मनात उसळत असतात आणि आपल्या उपासनेची, भक्तीची उपयुक्तता भौतिक मनाजोगतं राहाण्यावरच जोखली जाते. इतकी भक्ती करून, इतका जप करून, इतका नित्यनेम करून काय उपयोग, असा प्रश्न ही सकाम भक्ती, विषयाशी जडलेली वृत्ती निर्माण करते. वृत्ती खऱ्या अर्थानं मोकळी न झाल्याचं, जगाच्या प्रभावातून न सुटल्याचंच ते लक्षण असतं. वृत्ती घडविणं हाच परमार्थ आहे. मात्र देवाची प्राप्ती व्हावी या सद्वासनेआडून देहवासनाच चोरपावलांनी शिरते आणि वृत्तीला पुन्हा विषय जंजाळात गुंतवते. भगवंतापासून दूर करते तीच दुर्बुद्धी आणि भगवंताचं विस्मरण हेच खरं पाप, हे गोंदवलेकर महाराजांचं वचन लक्षात घेता भगवंताच्या सहज विस्मरणाचं जे सहज पाप आहे तेच आड येऊ लागतं. चैतन्य प्रेम