अनेकांना वाटतं, स्वत:ची बुद्धी न वापरता सद्गुरूंच्या आज्ञेचं आंधळं पालन करणं ही एकप्रकारची गुलामी आहे. गंमत अशी की सद्गुरूंच्या आज्ञेचं असं पालन करावं, हे त्या माणसानं स्वत:ची बुद्धी वापरून ठरवलेलं नाही, हे गृहितच धरलं जातं! गंमतीचा भाग सोडा, बरेचदा साधकाच्या जवळच्या लोकांना असं प्रामाणिकपणे वाटतं याचं कारण आजचं वातावरणही असंच धोकादायक आहे. भोंदू बाबाबुवांच्या नादी लागून अनेकांनी आयुष्य वाया घालवलं आहे, अशीही उदाहरणं आहेत. पण खरा सद्गुरू कसा ओळखावा, याची लक्षणंही युगानुयुगांपासून ग्रथित आहेत. आणि या भौतिक जगातही असंच आंधळं आज्ञापालन जो-तो अपेक्षीत नाही का? मुलानं मी सांगतो तेच ऐकावं, असं बापाला वाटतं. पत्नीनं माझ्या सांगण्याबाहेर जाऊ नये, असं पतीला वाटतं. भावानं माझं सांगणं अव्हेरू नये, असं भावाला वाटतं. तेव्हा आपल्या आज्ञेत जगानं राहावं, असं प्रत्येकालाच वाटतं. आपल्या ‘आज्ञा’ या आपल्या संकुचित इच्छांनुरूपच असतात. त्या भ्रम आणि मोहजन्यच असतात. पण याच भ्रम आणि मोहातून सोडविणाऱ्या खऱ्या सद्गुरूंच्या शुद्ध आज्ञांची जगाला भीती वाटते! सद्गुरूंच्या या आज्ञा या माझ्या भ्रामक मोहजन्य आवडींच्याच विरुद्ध असतात. माझ्या मूळ स्वरूपावर त्या आवडींनी देहबुद्धीचा वज्रलेपच लागत असतो. सद्गुरूंच्या आज्ञापालनानं ती देहबुद्धीच खरवडली जाते. जोवर देहबुद्धीची खपली सुटणार नाही तोवर आत्मबुद्धीनं जीवन प्रकाशित होणार नाही. ही देहबुद्धी माझ्यात चिंता भिनवते, भीती पोसते, काळजी लावते, दु:खाची कल्पना वाढवते. आश्रमात चोर शिरले तेव्हा चिंता, भीती, काळजीच उफाळून आली असेल ना! महर्षी त्यांच्यासारखे भीतीनं काळवंडून गेले नाहीत. उलट त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, ‘‘आपल्याकडे चोरण्यासारखं काय आहे ते तरी कळेल!’’ आणि झालं तसंच. काहीच चोरायला मिळालं नाही तेव्हा चोरांनी चिडून शिष्यांवरच हात उगारला! आता तरी प्रतिकार करावाच, ही ऊर्मी त्या शिष्यांच्या मनात उसळलीच असेल ना? तरीही महर्षीनी शांत राहायला सांगितलं! हे सारं आंतरिक शिक्षण आहे. आणि अगदी याच्याही उलट घडू शकतं बरं! माझ्या अंतरंगात त्या चोरांचा प्रतिकार मी करू शकत नाही, अशी भीती उपजली तर सद्गुरू प्रतिकारासाठी पुढे करतील! प्रभूंशी मैत्री झाली आणि सुग्रीवाला वाटलं की आता वालीपासून प्रभूच वाचवतील. वाली जिथं होता त्या जंगलाजवळ प्रभू सुग्रीवाला घेऊन गेले आणि वालीला आव्हान द्यायला सांगितलं. प्रभूंच्या आधारावर सुग्रीवानं नि:शंकपणे पुकारताच प्रभू म्हणाले, ‘‘आता तू युद्ध कर मी त्या झाडामागे थांबतो!’’ सुग्रीव घाबरून म्हणाला, ‘‘प्रभू वालीशी मी झुंजू शकत नाही.’’ तरीही प्रभूंनी सुग्रीवांना पुढे केलंच! लढाई सुरू झाली आणि एका मुष्टीप्रहाराने हेलपाटलेला सुग्रीव झाडामागे धावत येत म्हणाला, ‘‘मी म्हणालो होतो ना? वाचवा मला!’’ प्रभू म्हणाले, ‘‘तू पुन्हा लढ. मी पाहातो.’’ दुसऱ्यांदाही तेच झालं तेव्हा सुग्रीव पुन्हा विनवू लागला. प्रभू म्हणाले, ‘‘अरे लांबून मला तुम्ही दोघं सारखेच दिसता. तुला मी हार घालतो तो घालून जा. मग मी तुला ओळखू शकेन.’’ मग हार घालून सुग्रीव लढू लागला. वाली अखेरचा वार करणार तोच प्रभूंनी बाण सोडून त्याचा वेध घेतला. ही कथाही खूप मार्मिक आहे. सद्गुरूचा आधार मिळाल्यावर भौतिक संकटातून आपण आता सुखेनैव बाहेर पडू, असं साधकाला वाटतं. पण त्या संकटाशी झुंजण्यासाठी सद्गुरू त्यालाच सामोरं करतात आणि लढायला लावतात. पण ज्या माणसांशी हा साधक ‘लढत’ असतो त्यांच्यात आणि याच्यात काही फरक दिसत नाही! जेव्हा तो खरी हार मानतो तेव्हाच त्या संकटातही सद्गुरूच कसे तारतात, हे उमगतं! - चैतन्य प्रेम