परमात्मा आणि आपल्यातलं अंतर दूर करायचं असेल, अर्थात सद्गुरू जसे परमात्म भावात सदा स्थित आहेत तशी एकरूपता, एकलयता चित्ताची व्हावी, असं वाटत असेल तर नामस्मरण हाच एकमात्र उपाय आहे. समर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधाती’ल ८१ ते १०२ या क्रमांकांचे बावीस श्लोक हे याच नामाचा मागोवा घेणारे आहेत. त्यातील पहिला म्हणजे ८१वा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा:

मना मत्सरें नाम सांडूं नको हो।

NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!

अतीआदरें हा निजध्यास राहो।

समस्तांमध्यें नाम हें सार आहे।

दुजी तूळणा तूळितांही न साहे।। ८१।।

प्रचलित अर्थ : हे मना! देव-धर्म-संतांविषयी मत्सरग्रस्त म्हणजे संशयित होऊन नामस्मरण सोडू नकोस. अतिआदराने नामानुसंधान ठेव. सर्व साधनांचे सार हे नामच; त्याची सर यज्ञयाग, तापदिकांना

येणार नाही.

आता मननार्थाकडे वळू. आता मत्सरग्रस्त होणं म्हणजे संशयग्रस्त होणं नव्हे. मत्सरानं वास्तवाचं खरं आकलन होत नाही, हे खरं. पण त्यात संशय नसतो. उलट जे विपर्यस्त आकलन झालं असतं तेच नि:संशय खरं वाटत असतं. बरं आपल्याला मत्सर कोणाचा वाटू शकतो? तर आपल्याला जे हवं आहे ते ज्याला मिळालं आहे, असं आपल्याला वाटतं, त्याचा मत्सर वाटू शकतो. संतांचा मत्सर का वाटावा? त्यांना जे खरं हवं आहे.. जे परमात्म ऐक्य हवं आहे, ते आपल्याला कुठे हवंसं वाटत असतं? उलट तेच आपल्या जीवनाचं परम ध्येय आहे, हे संत आपल्याला आयुष्यभर समजावीत असतात. तेव्हा मत्सरानं आपण नाम सोडू का? मग खरा अर्थ काय असावा? आधीच्या श्लोकाच्या अखेरीस मत्सररूपी गाढवाचा उल्लेख केला आहे. त्या अनुषंगानं एक अर्थ असा घेता येईल की, नाम घ्यायला लागल्यावर जर अंत:करणात कुणाहीविषयी मत्सर उत्पन्न झाला तर अंत:करणातील नाम सांडून जातं! इतकं नामाला जपलं पाहिजे. पण गेल्या श्लोकातील चरणांचा जो क्रम आपण लावला तो पाहता या चरणाचा वेगळाच अर्थ प्रकट होतो. एखादी मोठी लाभाची योजना जाहीर होते तिचं माहात्म्य सर्वप्रथम अधोरेखित करतात ना? तसाच हा चरण! आधीच्या श्लोकात काय सांगितलं? तर नामाच्या आधारानं परमात्म्याचा वियोग नष्ट करायला सांगितला. आता परमात्म्याशी एकरूपता आली की सर्व संकुचितपणा गळून पडणारच ना? सर्व ‘मी’पणा संपून जाणार ना? तरीही हे मना, मत्सरे.. म्हणजे मद्+सरे.. मीपणा गेल्यावरही हे नाम सांडायचं नाही! गोंदवलेकर महाराज म्हणत ना? साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला आणि म्हणाला, नाम थांबव तरी थांबवणार नाही! आणि महाराज म्हणत शेवटच्या श्वासासोबतही जर घ्यायचं तर ते नामच आहे! समर्थही सांगतात.. अतीआदरें हा निजध्यास राहो! नामाचा ध्यास किती असावा? तर प्राण गेला तरी नाम राहावं! आता तिसरा चरण सांगतो की, समस्तांमध्यें नाम हें सार आहे! त्याचा प्रचलित अर्थ सर्व साधनांमध्ये नामसाधना सारभूत आहे, असं सांगतो. पण याचा जाणवणारा अर्थ अधिकच व्यापक होत जाणारा आहे. इथे समस्त असा फार मार्मिक शब्द समर्थानी योजला आहे. हे समस्त काय आहे हो? आपल्या अवतीभवतीचं सारं जग आहे ते! या जगातल्या प्रत्येक गोष्टीला जसं रूप आहे तसंच नावही आहेच ना? आणि रूप नष्ट होईल, रूपात बदल होईल, रूप विस्मरणातही जाईल, पण नाम कायम राहील ना? बाजारातून आपण एखाद्याला एखादी वस्तू आणायला सांगतो, तेव्हा त्या वस्तूचं रूपवर्णन करीत नाही, तर नुसतं नाव सांगतो! नामाचा उच्चार होताच रूप मनात प्रकटतं, नामापाठोपाठ रूप डोळ्यासमोर उभं राहतं. नामाचा उच्चार मनात भाव जागृत करू शकतो, भावाचं पोषण करू शकतो. इतकं नाम प्रभावी आहे.

– चैतन्य प्रेम