मनोबोधाच्या २३व्या श्लोकात याप्रमाणे प्रत्येक क्षणाचं मोल समर्थानी समजावलं. हा क्षण सद्गुरू स्मरणाशिवाय वाया जाऊ नये, हे समजावलं. बरं, प्रत्येक क्षणी सद्गुरूंचं स्मरण ठेवत असतानाही व्यावहारिक गोष्टीही करता येतात! थोडा विचार करून पाहा. प्रेमात पडलेले दोघे आपापल्या आयुष्यातली व्यावहारिक कर्तव्यं पार पाडत असतात, पण मनातून एकमेकांच्या सहज स्मरणातही मग्न असतात. मूल आजारी असलं तर प्रत्येक व्यवहार करताना आईच्या अंत:करणात त्याचंच स्मरण असतं. दूर गावी राहाणारी एखादी जिवाभावाची व्यक्ती आपल्या घरी येणार असते तेव्हा प्रत्येक गोष्ट करताना तिचं स्मरण असतंच. एवढंच कशाला, एखादी दुचाकी किंवा चारचाकी घ्यायची तीव्र इच्छा असेल तर तिचं स्मरण सदोदित मनात असतं. एखाद्या संकटाची भीती असेल तर त्या संकटाचंही सहजस्मरण असतं. तेव्हा एखाद्या गोष्टीचं सहजस्मरण होत असतानाच व्यवहारातल्या अन्य गोष्टी करण्याची क्षमता माणसात आहेच. मग त्याच क्षमतेचा उपयोग करून सद्गुरूंचं स्मरण राखणं अशक्य का असावं? तेव्हा अभ्यास केला की सगळं साध्य होऊ शकतं, हे भगवंतच गीतेत सांगतात. त्या अभ्यासाकडेच वळायला हवं. २३वा श्लोक हाच अभ्यास सांगतो की ‘‘न बोलें मना राघवेंवीण कांहीं।’’ हे मना, सद्गुरुशिवाय अन्य कोणतीही गोष्ट खोल चिंतनाचा, खोल मननाचा, खोल स्मरणाचा विषय होऊ देऊ नकोस. व्यवहारातल्या गोष्टींचंही चिंतन, मनन करावं लागतं, स्मरण साधावं लागतं. पण ते तेवढय़ापुरतंच असलं पाहिजे. त्यातच सगळा काळ जाऊ लागला तर एक क्षणदेखील खऱ्या चिंतनासाठी लाभणार नाही आणि मग जीवनातला प्रत्येक क्षण असा वायफळ गोष्टीत वाया जाऊन अखेर जीवनाची अमूल्य संधीच संपून जाईल! मग जगण्याच्या अशा रीतीनं जो वासनापुंज निर्माण झाला आहे तो पुन्हा अशाच रीतीच्या जीवनाचं दान पदरात टाकेल! आता मनोबोधाच्या २४व्या श्लोकात समर्थ ‘‘न बोलें मना राघवेंवीण कांहीं।’’ या चरणाचं पुढचं पाऊल टाकतात! ते म्हणजे ‘‘सदा सर्वदा नाम वाचें वसों दे।’’!! आता हा श्लोक प्रथम पुन्हा पूर्ण वाचू. समर्थ सांगतात, ‘‘रघूनायकावीण वायां सिणावें। जनासारिखें व्यर्थ कां वोसणावें।। सदा सर्वदा नाम वाचें वसों दे। अहंता मनीं पापिणी ते नसों दे।। ’’ आधीच्या श्लोकात समर्थानी सद्गुरूशिवाय अन्य बोलण्याचा विषय नको, असं सांगितलं. आता बोलणं या एका शब्दात इतर सर्वच क्रिया आल्या आहेत. म्हणजे सद्गुरुशिवाय बोलण्याचा, पाहण्याचा, अनुभवण्याचा, ऐकण्याचा अन्य विषय नको, असं त्यात अध्याहृत आहे. तर आता या २४व्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत सांगतात की, ‘‘रघूनायकावीण वायां सिणावें। जनासारिखें व्यर्थ कां वोसणावें।।’’ हे मना! या सद्गुरूशिवाय व्यर्थ का शिणतोस? आणि ‘‘जनासारिखें व्यर्थ कां वोसणावें।।’’ याचा अर्थ असा की लोकांसारखं व्यर्थ का बरळतोस? इथं समर्थाचा आणखी एक श्लोक आठवतो.. बहु िहडता सौख्य होणार नाही। शिणावे परी नातुडे हित काही! या जगात अपेक्षापूर्तीच्या तळमळीनं कितीही वणवण करा, हे जग काही खरं समाधान देऊ शकत नाही. हित तर साधणार नाहीच, केवळ नसता शीण वाटय़ाला येईल. तेव्हा सद्गुरुंशिवायच्या चिंतनानं, मननानं, विचारानं, कल्पनेनं, स्मरणानं नाहक शीणच वाटय़ाला येणार आहे. शाश्वताशिवायचं सारं स्मरण हे अशाश्वताचंच असतं आणि अशाश्वताच्या मनन, चिंतनानं आंतरिक स्थिरता काही टिकत नाही. शाश्वत समाधान काही लाभत नाही. उलट लोकांप्रमाणेच हे साधका तुझं सर्व आंतरिक ‘बोलणं’ हे मन अधिकच खच्ची करणारं ठरतं. - चैतन्य प्रेम