शाश्वत काय आहे, याचा शोध घेण्याची सोपी रीत म्हणजे अशाश्वत काय आहे, याचं निरीक्षण सुरू करणं. आपल्या अंतरंगात नेमकी कसली ओढ आहे, याचा शोध त्यासाठी प्रथम सुरू करायचा. ही ओढ बहुतांश वेळा माणसांबद्दलच असते. त्या ओढीला आपण कर्तव्याच्या आवरणात लपेटलं असतं. ‘मुलावर आई म्हणून माझं प्रेम आहे. त्यात गर ते काय,’ अशा प्रश्नाची ढाल पुढे करीत आपण त्या प्रेमाचं बोट धरून मोहाच्या प्रांतात होणारा प्रवेश लपवू पाहतो. याप्रमाणे कोणत्याही नात्याची ढाल पुढे करीत, आपण केवळ कर्तव्य पार पाडत असल्याचाच युक्तिवाद करतो. त्यातूनच मग दुराग्रह, हट्टाग्रह जोपासले जातात. जर आपण कर्तव्य केवळ करत असतो, तर मग ‘प्रेमा’चा हिशेब ठेवला गेला असता का? ‘मी एवढं आजवर केलं मग माझं ऐकायला नको का,’ असा प्रश्न कर्तव्यानंतर कधीच उद्भवू शकत नाही. तेव्हा जिथे जिथे मनाची ओढ असते तिथे तिथे आपण बद्ध होत असतो, परावलंबी होत असतो ही जाणीव सद्गुरू बोधातूनच होत असते. तेव्हा आजवर ज्या भ्रामक गोष्टींना आपण कवटाळून ‘सुख’ ओरबाडण्याची धडपड करीत सदैव अतृप्तच राहात होतो त्या गोष्टंचं खरं अशाश्वत रूप सद्गुरू जाणवून देतात. मग सद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास जेव्हा सुरू होतो तेव्हा खऱ्या अर्थानं निश्चिंत, निशंक, निर्भय जगणं म्हणजे काय, याची झलक आपल्याच जीवनात मिळू लागते. परिस्थिती बदलतेच असं नाही, अडचणी संपल्या असतात असं नाही; तरीही आंतरिक धारणा बदलली असते, विचार बदलला असतो आणि म्हणूनच आहे त्याच परिस्थितीतही आपण पूर्वीपेक्षा अधिक सुखी आहोत, हा नवा शोध लागतो!  परिस्थिती आज चांगली आहे, उद्या वाईटही असेल.. अनुकूलता आणि प्रतिकूलता सतत येत-जात राहतात. त्यांना मनानं चिकटलं तर अखेरीस मनच दुख भोगतं, हे जाणवू लागतं. मग आहे त्याच परिस्थितीतही आणि ती परिस्थिती पालटण्यासाठीचे प्रयत्न कर्तव्य म्हणून करीत असतानाही मन शांत, स्थिर, समाधानी राहात आहे, हा अनुभव येऊ लागतो. याच अनुभवाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, ‘‘जगीं धन्य तो रामसूखें निवाला!’’ पण रामसुख प्राप्त होण्याची धन्यावस्था कशी प्राप्त होते? त्यासाठीचे तीन टप्पे फार महत्त्वाचे आहेत. हे टप्पे म्हणजे, ‘‘कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला। देहेभावना रामबोधें उडाली। मनोवासना रामरूपीं बुडाली॥’’ हे टप्पे पार झाल्याशिवाय रामसुख लाभतच नाही. परम तत्त्वाविषयी ऐकण्याची गोडी वाढली आणि त्यात तल्लीनता आली तरच देहभाव उडून जातो आणि मनोभाव बुडून जातो! जोवर मी संकुचित देहभावात आणि मनोभावात रुतून आहे तोवर मी परम शाश्वताचं सुख अनुभवूच शकत नाही. तेव्हा प्रथम परम तत्त्वाविषयी जाणण्याची जिज्ञासा मनात जागली पाहिजे. त्याचा शोध घेण्याची आस लागली पाहिजे. मग त्याच्याचविषयी किती जाणून घेऊ आणि किती नको; अशी अवस्था तर झाली पाहिजे! ही संधी सद्गुरूच देतात ती आपल्याच जीवनाबद्दलच्या साशंकतेची ठिणगी मनात फुलवून! जगत असताना जेव्हा आपल्या मनातल्या गृहीतकांना धक्का बसतो, अपेक्षांना तडा जातो, विश्वासाला हादरा बसतो तेव्हा या जीवनात खरं सुख म्हणून काही आहे की नाही, कुठेतरी विश्वास ठेवावा अशी जागा आहे की नाही, या शंकेची ठिणगी मनात पडते आणि तिनं निर्माण झालेला भडका जोवर खरं उत्तर मिळत नाही तोवर शांत होत नाही! या ठिणगीनं अंतकरणाची तगमग अशी वाढू लागते की जिथून कुठून या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं वाटतं तिथं तिथं मन शोध घेऊ लागतं. परमार्थाच्या शोधाची सुरुवात या एका लहानशा ठिणगीनं झाली असते.