ज्याला नाम घेण्यात गोडी नाही त्याला जर अध्यात्माच्या मार्गात यायचं असेल तर यम-नियमांपासून साधनेची आटाआटी करावी लागेल, हे आपण पाहिलं. मग नुसत्या नामाचा पुकारा केल्यानं सद्गुरू धाव घेईल, हेही पाहिलं. आता नामाच्या मार्गानं जाऊनही अष्टांगयोग कसा साधला जातो, हे पाहण्याआधी एक प्रश्न आला की नामाचा आधार घेण्याऐवजी माणसानं त्याला दिलेल्या क्षमता आणि बुद्धीच्या आधारावर त्या परमसत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे? पण आपल्यात ज्या क्षमता आहेत आणि जी बुद्धीची झेप आहे ती या देहातच कोंडलेली नाही का? या क्षमतांचा आणि बुद्धीचा वापर आपण आजवर देहभाव पोसण्यासाठीच केला नाही का? अध्यात्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञानासाठी आणि त्याच्या धारणेसाठी क्षमतांची आणि बुद्धीची गरज आहेच, पण त्या क्षमता आणि ती बुद्धी ही देहभावापासून विलग झालेलीच असते. य. श्री. ताम्हनकर यांनी निंबरगी महाराज यांच्या बोधाच्या आधारे ‘आचरण योग’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात गुरुदेव रानडे यांच्या चिंतनाचा मोठा ऊहापोह आहे. आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वराचा साक्षात्कार व्हावा, या हेतूनं माणूस अध्यात्माच्या मार्गाकडे वळतो. या साक्षात्कारासाठी बुद्धीची आवश्यकता किती आणि बुद्धीच्या मर्यादा किती, यांचा विचार गुरूदेवांनी केला आहे. गुरुदेव म्हणतात, ‘‘पुष्कळांची अशी समजूत आहे की, साक्षात्कारातील अनुभवासाठी बुद्धी, भावना आणि क्रियाशक्ती असल्या म्हणजे पुरे..’’ गुरुदेव मात्र या तिन्हींना मर्यादा असल्याचेच सांगतात आणि साक्षात्काराच्या अनुभवासाठी प्रतिभाशक्तीची गरज मांडतात. ते म्हणतात, ‘‘ही प्रतिभाशक्ती म्हणजे उपजत बुद्धी वा जन्मानंतर कमावलेली बुद्धी किंवा समज नव्हे. बाह्य़ इंद्रियांच्या द्वारे मेंदूतील केंद्रावर आलेले संदेश एकत्र करून बाह्य़ वस्तूंचे ज्ञान होण्याची प्रक्रिया अर्थात ‘परसेप्शन’ही नव्हे.’’ (पाथवे टू गॉड इन हिंदूी लिटरेचर, पृ. ३६८). ‘भगवद्गीता’ या पुस्तकात ते म्हणतात की, ‘‘बुद्धीला ज्याचे आकलन होत नाही, अशा गोष्टीचे ज्ञान करून देणारी, बुद्धीपलीकडची, वरची अतींद्रिय शक्ती या अर्थाने मी इन्टिय़ूशन किंवा प्रतिभा हा शब्द वापरत आहे.’’ गुरुदेव रानडे ‘उपनिषद्रहस्य’ या ग्रंथात म्हणतात की, ‘‘केवळ बुद्धीच्या जोरावर अंतिम सत्याचे ज्ञान मिळवता येते की बुद्धिगम्य नसलेल्या दुसऱ्या एखाद्या श्रेष्ठ मार्गाचा अवलंब केल्यानेच शुद्ध आत्मज्ञानमंदिरात आपला प्रवेश होईल, या प्रश्नास शुद्ध आत्मज्ञान मिळवायचे असल्यास एकाकी बुद्धीचा काही उपयोग होत नाही, आत्मप्राप्तीच्या कामात बुद्धी केवळ पंगू आहे, असे उपनिषत्कारांचे उत्तर आहे.’’ तसंच, ‘‘केवळ बौद्धिक तयारी कितीही केली तरी त्यामुळे प्रत्यक्ष आत्मज्ञान प्राप्त होत नाही, हे उपनिषत्कालीन आत्मज्ञांना पूर्ण माहित होते. आत्मज्ञानास त्यांनी इतक्या उच्च आसनावर बसवले आहे की त्याच्याशी तुलना केली असता सर्व बौद्धिक ज्ञान म्हणजे केवळ शाब्दिक जादूगिरी किंवा शब्दजाल आहे, अथवा नुसता शारीरिक शीण आहे, असे वाटते.’’ थोडक्यात देहभावात जो आजन्म जगत आला त्याच्या बुद्धीची झेप आत्मज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. जन्मजात आणि जन्मल्यानंतर कमावलेली बुद्धी ही ज्या अनुभवांतून विकसित होते तेही संकुचितच असतात. त्याच्यातल्या भावनिक क्षमता स्वत:चंच दु:खं पोसण्यापुरत्या आणि त्याची क्रियाशक्ती ‘मी’पणाच्या रक्षणासाठीच राबत असते. मग ही बुद्धी, भावनाक्षमता आणि क्रियाशक्ती अध्यात्माच्या मार्गात कितपत उपयोगी पडणार? त्यासाठी या बुद्धी, भावना आणि क्रियाक्षमतेपलीकडे गेलं पाहिजे, त्यांच्या कक्षा रूंदावत त्यांना व्यापक केलं पाहिजे आणि त्यासाठीचा आधार हाही तितकाच समर्थ आणि व्यापक पाहिजे! -चैतन्य प्रेम