"बापरे किती काळजी करते ही" त्याच्या मनाला वाटलं. तस तिला समजून घेण्याची ओढ लागली. त्यातच एक चांगली गोष्ट झाली. त्याला कॉलेजजवळ रूम मिळाली. प्रवासाचा वाचलेला वेळ तो कॉलेजमध्ये घालावत होता. दोघांचे वर्ग वेगवेगळे असल्यानं जास्त बोलणं होत नव्हतं. मात्र हाय बाय सुरु होतं. कधी मधी मेसेज पाठवत होता. नंतर हे मेसेज दररोजचे झाले. आत ती पण रिप्लाय पाठवत होती. पण सुरुवात त्यालाच करायला लागायची. अशात फोनवर ही बोलणं व्हायचं. कॉलेजच्या गप्पां घरापर्यंत कधी गेल्या दोघांना देखील कळलं नाही. तिच्या घरची बरीचशी माहिती त्याला होती. आणि तिलाही त्याच्या बद्दलची. कॉलेजमध्ये मात्र ते जास्त बोलतं नव्हते. पण रात्रीचा फोन न चुकता. उशिरापर्यंत बोलणं व्हायचं. एवढं काय बोलता हे विचारलं तर सांगायला जमत नाही. सर्व मित्र मैत्रिणी यांच्या बद्दल जास्त गप्पा व्हायच्या. तिचं पोस्टपेड कार्ड असल्यानं बॅलन्स संपला असं कधी झालं नाही. किती वेळ बोललो याचं भान त्यांना नसायचं. फोनवर नियमित ती बोलत होती. मात्र त्या दिवशी कॉलेजमध्ये बऱ्याच दिवसांनी आवाज दिला. "अक्षय.अक्षय" ओळखीचा आवाज असल्यानं त्याने लगबगीनं पाठीमागे बघितलं. तिच्यासोबत एक मैत्रीण होती. "आरती तू ? बोल ना काय म्हणतेस ?" "नॅशनल सेमिनार बद्दल बोलायचं होत" त्याला याबाबत काहीच माहिती नव्हती प्रश्नार्थक नजरेनं त्यानं विचारलं "कसला सेमिनार?" "अरे सायकॉलॉजीचा, नाशिकला होतोय" असं सांगत तिनं विचारलं "तू येणार का?" नाशिकला जाऊन यायचं म्हणजे दिवस सोबत घालवता येणार हा विचार करत तो म्हणाला. "हो येणार की, नक्की जायला हवं" काहीही माहिती नसताना त्यानं होकार दिला. मॅम आणि मुलं मिळून जायचं ठरलं. मात्र काही कारणांनी मॅमचं अचानकपणे कॅन्सल झालं. त्यापाठोपाठ काही मुलीही यायला नको म्हणाल्या. जाण्याचं जवळ जवळ आता रद्द होणार हे फिक्स होतं. पण अक्षयला मनातून जावं असं खूप वाटतं होतं. कदाचित या निमित्ताने तिला मनातलं बोलायची संधी मिळेल असा त्याचा अंदाज होता. म्हणून त्यानं स्वतः सेमिनारला जाण्याचा मोर्चा हाती घेतला. दोघा तिघांना विचारलं. मात्र कोणी तयार होतं नव्हतं. भरपूर प्रयत्न केल्यानंतर. धीरज, सुशांत आणि रोशन तयार झाले. त्यामध्ये धीरजने यायची तयारी दर्शवली. मात्र त्यातच पण घातला. "तू म्हणतोस म्हणजे नक्की चांगलं काही असणार." "मला यावंही वाटतय रे, पण माझ्याकडे पैसे नाहीत" त्यावेळी अक्षयच्या खिशात जेमतेम पाचशे रुपय असतील मात्र तरीही तो बोलला. "एवढंच होय, दोस्त किस काम आयेंगे फिर" "पैशांची काळजी करू नको, ती माझ्यावर सोड. तू फक्त निघायची तयारी कर" "आणि हो मानसीला तू जाणार असल्याचं सांगायला विसरू नको" धीरज आणि मानसी चांगले मित्र. एकाच कॉलनीत राहायचे. तशी ती त्याच्यावर मरायची. पण अभ्यास आणि पुस्तकांपुढे ते कळतही नव्हत. "हो, घरी जातना सांगणार आहे तिला" धीरज बोलला. तसे दोघे एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करत होते. पण तरीही आठवण करून दिली होती. उगाच विसरायला नको. परवा जायचं होतं. पण अजून होच्या पलीकडे काही ठरलेलं नव्हतं. कॉलेज संपवून अक्षय रूमवर गेला. जेवण आटोपलं आणि मोबाईल हातात घेतला. तेवढ्यात फोन आला. "व्वा. काय टायमिंग आहे" स्वतःशी बोलत त्यानं फोन उचलला. समोरून आवाज आला. "हॅलो अक्षय. मानसी बोलतेय" त्याचा प्लॅन सक्सेस झाला होता. मनातून खूश होता. बोलण्यात ते जाणवू न देता तो बोलला. "बोला मॅडम काय म्हणतायत.. आमची कशी आठवण काढली" "काही नाही रे तुम्ही नाशिकला सेमिनारला जातायत हे कळलं" "हो, जातोयत की" "मला पण यायचं होतं, म्हणजे मी अशी कधी गेलेली नाही. जमेल का तुमच्या सोबत" गाडी करायला माणसांचा पत्ता नाही. तरी तो म्हणाला, "बरेच जण येतायत, अॅडजेस्ट होईल का ते पाहावं लागेल" "बघ न प्लीज, मला यायचंय रे. प्लीज कर ना तेवढं" त्याला तिच्या प्लीजचं कारण माहिती होतं. मात्र खरंच तिला सेमिनार अटेंड करायचा असा फिल आणत. "तुला आवड आहे, म्हणून करू काही तरी, पण ऐन वेळेला कॅन्सल करायचं नाही" अशी गुगली टाकत त्यानं तिच्याकडून दोन सीट्सचं कन्फर्मेशन घेतलं होतं. "नाही रे, मी नक्की येणार" तिनं विश्वासानं सांगितलं. तिला कधी जायचं आणि किती खर्च येणार हे सांगून त्यानं फोन ठेवला. आणि रोशनला फोन लावला. "हॅलो रोशन.. हे बघ आपण परवा सकाळी लवकर निघतोय. तू, मी, धीरज, आरती आणि मानसी" मानसी येणार म्हटल्यावर तो येणार नाही असं शक्यचं नव्हतं. उलटं अपेक्षेपेक्षा जास्त सुखद धक्का त्यानं दिला. "माझ्या मामाची गाडी आहे, आपण त्यानं जाऊ" "हो चालेल की" म्हणतं रोशनच्या मामाच्या गाडीने जायचं नक्की केलं. आणि फोन ठेवला. स्वतःच्या हुशारीवर अक्षय जाम खूश झाला. सेमिनार कम ही पिकनिकच झाली होती. सकाळपर्यंत जाऊ की नाही काही खरं नव्हतं. मात्र आता फिक्स झालं होतं. कालपासून या प्लॅनिंगमध्ये त्यानं फोन केला नव्हता. म्हणून आरतीला फोन करून कोण येणार. कसं जायचं हे सांगितलं. तिनं वेगळंच उत्तर दिलं. "आरे आपलं जायचं फिक्स नव्हतं, म्हणून मी आणि केदारने आज संध्याकाळी जायचं ठरवलं" त्यानं जरा रागात विचारलं. "ते कसं?" "केदारची मोठी बहीण नाशिकलाच आहे. आज संध्याकाळी ट्रॅव्हल्सने निघायचं आणि उद्या तिच्या घरी फ्रेश होऊन सेमिनार अटेंड करायचा" तिनं तिचा प्लॅन सांगितला. साधं सांगणंही तिला गरजेचं वाटलं नाही. खरंतर त्याला खूप संताप आला होता. पण ऐनवेळेला खोळंबा नको. आणि सगळ्यांना सांगितलं आहे. म्हणून तो रागवला नाही. तो शांत झाला हे पाहून तीच बोलली. "केदार बुकिंग करायला गेलेला आहे. मी बघते केलेली नसेल तर कॅन्सल करायला सांगते" "चालेल" एवढंच बोलून त्यानं फोन ठेवला. त्याचा सगळा मूड खराब झाला. केदारला पाहून मूड ऑफ होण्याचं कारण म्हणजे तो आणि आरती सतत सोबत असायचे. कॉलेजमध्ये त्यांची काही चर्चा नव्हती. मात्र त्याला पाहिलं की, याचं मन खायचं. "दोघे मित्र आहेत ठीक आहे पण सारखा केदार केदार केदार काय प्रकार आहे हा ?" तो मनाशी बोलत होता. तेवढ्यात तिचा फोन आला. "केदार बुकिंगच्या ऑफिसमध्ये आहे. आपलं फिक्स आहे ना? म्हणजे तिकीट नको ना बूक करू?" तिनं प्रश्न विचारला. त्यावर तो म्हणाला "आम्ही येणार आहोत, तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकतात" "तसं नाही रे ऐनवेळेला कॅन्सल होऊ नये म्हणून म्हणते. आणि मला कसल्याही प्रकारे तो अटेंड करायचाय. परवा आमची एक्झाम असताना मी येतीये" तिच्या बोलण्यातून तिची तळमळ दिसत होती. "डोन्ट वरी..नक्की जाणार आहोत" त्यानं विश्वास दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं रात्री सगळ्यांना रिमाइंड केलं. रोशन सुरुवातीला अक्षयला पीक करणार आणि त्यानंतर सगळ्यांना असं ठरलं. सकाळी चारची पिकअप वेळ ठरली. सगळं ठरवता ठरवता बारा वाजले होते. सकाळी तिच्यासोबत जाणार या विचारात त्याला झोप आली नाही. असा डोळा लागतोय तो चारचा अलार्म झाला. उठून त्यानं ब्रश हातात घेतला. रोशनला फोन करून उठवलं. त्यानंतर आरतीला फोन केला. पुढच्या पंधरा मिनिटांत तयार असल्याचं तिनं सांगितलं. तो ही तयार झाला. तेवढ्यात रोशनचा फोन आला. तो काही बोलण्याच्या अगोदर हाच बोलला. "दुसऱ्या मिनिटाला गेटवर आहे" छोट्या आवाजातच तो बोलला. "अरे थोडा घोळ झाला" "काय झालं?" "ड्रायवर काका फोन घेत नाहीत" "आरे गाडी चालवत असतील" तो बोलला. "नाहीरे पाठीमागच्या अर्ध्या तासापासून ट्राय करतोय, उचलत नाहीत" आता मात्र हाही टेन्शनमध्ये आला. आतापर्यंत ऐकलेलं ड्रायवर लोकांचे सगळे किस्से डोळ्यासमोर आले. तेवढ्यात वेटिंगवर आरतीचा फोन. त्यानं घड्याळाकडे पाहिलं. सव्वा चार झाले होते. ती सतत फोन करत होती. मोठ्या हिमतीने त्यानं फोन उचलला. "अरे किती वेळ, उशीर होईल. लवकर निघा ना" त्रासलेल्या स्वरात ती बोलली. "निघालो आहोत, पण गाडी फेल झाली. पुढच्या पंधरा मिनिटात तुझ्या रूम जवळ असू" त्यानं थाप मारली. तसंही ती एकण्यापलीकडे काहीही पर्याय नव्हता. रोशनचा पुन्हा फोन आला. आणि तुझ्या रूम खाली आम्ही पाच मिनिटांत पोहोचत असल्याचं त्यानं सांगितलं. काहीही प्रश्न न करता त्यानं फोन ठेवला. कारण प्रश्न करून गेलेला वेळ परत येणार नव्हता. सगळ्यांना पीक करत शहराबाहेर पडायला सहा वाजले. दोन तास लेट. त्यामुळं सुरुवातीला शांत शांत असलेलं वातावरण निवळायला वेळ लागला. मग आरतीच सेमिनार विषय, पेपर प्रझेंटेशन सारं काही सांगत बसली. अक्षय मात्र तिच्या संगण्याकडे बघत होता. एका ठिकाणी सगळ्यांनी नाष्टा केला. पुन्हा ते थांबले नाहीत. ड्रायव्हर काकांनी सकाळी झालेला उशीर कव्हर केला. त्यामुळे वेळेवर पोहोचलो. परतीच्या प्रवासाला निघता निघता उशीर झालेला. आरती आणि अक्षय शेजारी बसले होते. तसा तो मुद्दामचं तिच्याजवळ बसला होता. आता गाडीतील वातावरण हलकं फुलकं होतं. फुल मज्जा मस्ती. गाण्याच्या भेंड्या, कविता, जोक्स फुल टू धम्माल सुरु होती. जेवण झाल्यानंतर सगळे पेंगायला लागले. अक्षय मात्र जागाच होता. आरतीचं डोकं त्याच्या खांद्यावर आलं होतं. तो आतून खूप सुखावला होता. तिची मान अवघडणार नाही. याची काळजी त्यानं घेतली. थोड्या वेळाने त्याचं डोकं तिच्या खांद्यावर होतं. रात्री उशिरा ते घरी पोहोचले. सगळ्यांना ड्रॉप करून रोशन आणि अक्षय आपापल्या घरी गेले. कालची झोप नाही. दिवसभराचा प्रवास त्यामुळं पाचव्या मिनिटाला तो गाढ झोपी गेला. सकाळी उशिरा उठला फोन पहिला तर पंधरा मिस्ड कॉल आणि तेही आरतीचे. काळजीनं त्यानं फोन लावला. तिनं रिसिव्ह केला नाही. झटपट उरकलं आणि तो कॉलेजला गेला. लेक्चर संपून ती बाहेर पडत होती. तसेच ते कॅन्टीनला गेले. "ठीक आहे ना सगळं ?" "तुझे मिस कॉल आले पण मी उचलला नाही" "काय झालं?" एकापाठोपाठ एक प्रश्न सुरु होते. "आरे हो, हो, किती विचारशील?, " "काही नाही झोप येत नव्हती म्हणून सहज केला होता पण तू कुंभकर्ण" दोघे बोलत असताना केदार टपकला. थोड्या गप्पा झाल्या आणि ते दोघे निघून गेले. त्याला केदारचा आणि झोपेचा खूप राग आला. एवढ्या उशिरा सहज कोणी फोन करणार नाही. ते ही पंधरा. माझ्या मनात सुरु आहे. तेच तिला वाटत असेल का? असेल तर मग आत्ता एवढं सहज तिनं का घेतलं? तो केदाऱ्या टपकला ना, म्हणून ती बोलली नाही. बोलायचं असतं तर ती त्याला कटवू शकली असती ना. असा विचार त्याच्या मनात सुरु होता. त्याच विचारात दोन लेक्चर झाले. आणि घरी निघाला. तर गेट बाहेर केदार आणि रोशनचा राडा सुरु होता. आयती संधी मिळाली. रोशनच्या आडून त्यानं सगळं राग काढला. चांगली हाणामारी झाली. सगळं संपवून तो घरी गेला. शेवटचे काही दिवस राहिले होते. त्यानंतर दिवाळी सुट्टी आणि परत आल्यावर परीक्षा असा शेड्युल ठरलं होतं. ते पाहात असताना नेहमीप्रमाणे आरतीचा फोन आला. सगळं बाजूला सारून गॅलरीत जाऊन तो उभा राहिला. "यापुढे मी तुला फोन करणार नाही. तू ही मला करू नको" कानांवर विश्वास बसत नव्हता. मात्र ते खरं होतं. केदाऱ्याने घाण केली. वीज चमकावी तसा विचार आला. "का?" म्हणून विचारलं. "मला बोलावं वाटतं नाही, का हे मला माहिती नाही" असं अजब उत्तर सांगून तिनं फोन ठेवला. पुन्हा पुन्हा फोन लावला मात्र लागत नव्हता. स्विच ऑफ सांगत होता. तो उशिरा पर्यंत लावतच होता. आता नंबर ब्लॅक लिस्टमध्ये गेला होता. तिच्या अचानक न बोलण्याचा त्याला खूप त्रास झाला. दिवाळीच्या सुट्टीत घरी जाण्याचा बेत त्यानं रद्द केला. तीन कारण सांगितलं नव्हतं. त्यामुळे केदारमुळेच तिनं माझ्याशी बोलणं बंद केलं. असा पक्का समज झाला होता. क्रमशः - तीन फुल्या, तीन बदाम