‘धिन्नल्ले गहिल्ले तत्थ मरहट्टे’ हा प्राचीन काळी भाष्यकारांनी मराठी माणसाचा नोंदलेला विशेष. म्हणजे काय, तर दिल्या-घेतल्या प्रत्येक गोष्टीवरून भांडणारा तो मराठी माणूस. आताच्या आधुनिक काळात परिचय बदलणं तर सोडाच, प्राचीन भाष्यकारांचं ते वचन किती तंतोतंत होतं हे सिद्ध करण्यासाठी म्हणूनच आपण जगतो की काय, अशी शंका यावी, अशी स्थिती आणि तसं वातावरण मराठी मुलुखात आजूबाजूला आहे. वाद घालण्यासाठी आपल्याला काहीही चालतं. चार-दोन लोक एकत्र येतात आणि मग माथी भडकवतात, ते आपल्याला पुरेसं ठरतं. मग त्यात कधी कुणी कोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी आहे असं म्हणतं आणि मग नव्या वादाला तोंड फुटतं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यात वाद उकरून काढण्यासारखं काही नसतंच मुळी. आपल्या देवतांचं दैवतीकरण कोणत्या पद्धतीने शतकानुशतकं झालं आहे, त्याचा शोध घेतला तर आपल्याच लोकसंस्कृतीमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.

प्रत्येक धर्माचं अंतिम उद्दिष्ट हे मोक्ष, दु:खान्त किंवा निर्वाण याप्रत पोहोचणारं असतं. मार्ग अध्यात्माच्या वाटेवरून जाणारा असतो. पण त्या वाटेवर संसार काही चुकत नाही. संसार असं म्हणताना दर खेपेस लग्न करून केलेला संसार अपेक्षित नसतो. तर या भूतलावर जन्म झाल्यानंतर दिवस-रात्र, भूक लागणं या माणसाला न चुकणाऱ्या गोष्टी म्हणजेच संसार किंवा भवसागर होय. तर अध्यात्माच्या वाटेवर असताना संसार चुकत नाही, ना तो कोणाला टाळता आला, हा लोकसंस्कृतीने घालून दिलेला पहिला धडा असतो. मोक्ष हे अंतिम सत्य असलं तरी संसार चुकत नाही हे लोकसंस्कृतीतील पहिलं सत्य असतं. शतकानुशतकं मानवी संस्कृती याच लोकसंस्कृतीतील सत्याच्या बळावर टिकून राहिली आहे. म्हणूनच तर समर्थ रामदास म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग धरावे परमार्थी विवेका, प्रपंच सोडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल!

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

लोकसंस्कृतीतील हे सत्य समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण घेत असलेल्या भूमिकांमुळे संस्कृती टिकते अन्यथा ती लयाला जाणार, असं आपल्याला वाटत असतं. मुळात लोकसंस्कृतीची गंगा ही शतकानुशतकं वाहते आहे, सारे प्रवाह एकत्र घेऊन. त्यातील सकस व समाजासाठी आवश्यक तेवढं टिकतं, पुढे जातं. ते कुणा एकामुळे नाही तर संपूर्ण समाजामुळे ते होत असतं. लोकसंस्कृतीचं हे चक्र. यात अनेक आक्रमणं आली, गेली, पचलीदेखील. म्हणून यंदाच्या या लोकसंस्कृतीच्या सृजनोत्सवाच्या निमित्ताने लोकसंस्कृतीतील हे सत्य आपण समजून घ्यावं आणि वृथा चिंता सोडून द्यावी, म्हणून ‘लोकप्रभा’ने त्याप्रत पोहोचण्यासाठीच देवीच्या या नवरात्र विशेषांकात लोकसंस्कृतीचा धागा नेमका समजून घेता येईल, अशी अंकाची रचना केली आहे. लोकसंस्कृतीची वीण घट्ट आहे, काळजी करू नका, असा एक आश्वस्त दिलासा यात आहे.

सृजनोत्सवाच्या शुभेच्छा!
01vinayak-signature
विनायक परब