पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे बाहेरचे वातावरणही आल्हाददायक झाले आहे. अशा कुंद आणि थंड हवेत आपल्याला गरमागरम आणि चविष्ट पदार्थाची हमखास आठवण येते. त्यातच मांसाहारी पदार्थ असतील तर ते खाण्याचा मोह आवरता येणे कठीणच. ठाण्यातील कोपरी विभागातील अनिल खिमा या कॉर्नरवरील खिमा पॅटिस म्हणजे लाजवाब. मासांहारी पदार्थ आवडीने खाणाऱ्या खवय्यांचे हे जंक्शन ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी कायम खवय्यांचा गराडा पडलेला असतो. कोपरीतल्या खाऊगल्लीत अनेक पदार्थ मिळतात. प्रत्येकाचे आपापले वैशिष्टय़ आहे. मात्र खिमा-पाव म्हटले की अनिल पंजवानींचे दुकानच आठवते. या गुजराती इसमाच्या खिमा-पावच्या चवीची कीर्ती संपूर्ण शहरात पसरली आहे. त्यामागे त्यांची मेहनत आहे. खिम्यात टाकला जाणारा मसाला ते स्वत: तयार करतात. त्यामुळेच वेगळी चव राखू शकलो, हे ते अभिमानाने सांगतात. १९८९ मध्ये अनिल पंजवानी यांनी खिमा-पावची छोटीशी गाडी टाकली. पण या गाडीवरून सुटणारा खिम्याचा दरवळ ठाणेकरांना आपल्याकडे खेचत राहिला. ठाण्यातील अस्सल मांसाहारी प्रेमी येथील खिमा-पावची चव जाणून आहेत. गरम खिमा आणि त्यावरील लाल र्ती कधी एकदा खातोय असे ठाणेकरांना होते. मोठे अनिल पंजवानी हे छोटय़ा अनिल पंजवानी यांचे सख्खे भाऊ. दोन सख्खा भावांची नावे एकच असल्याने भेदासाठी नावांमागे छोटे आणि मोठे लावतात. मात्र छोटे अनिल पंजवानी आपल्या भावामुळेच हा व्यवसाय सुरू केल्याचे सांगतात. पंजवानी यांच्याकडे चार ते पाच माणसे कामाला आहेत. ते सर्व कारागीर महाराष्ट्रीय आहेत. हा खिमा तयार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे पंजवानी यांनी आवर्जून सांगितले. गेली २५ ते ३० वर्षे ही माणसे त्यांच्याकडे काम करीत आहेत. हल्ली त्यांनी त्यांचा व्यवसाय पुढच्या पिढीकडे सोपविला आहे. त्यांचा मुलगा सोनु पंजवानी आता दैनंदिन व्यवस्थापन पाहतो. मात्र गेल्या ३० वर्षांत येथील खिमा-पावची चव बदललेली नाही. मोठय़ा विश्वासाने आणि अपेक्षेने येणाऱ्या खवय्यांना सदैव उत्तम तेच देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे ते समजतात. दरदिवशी साधारण २०० प्लेट खिमा सहज संपतो, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच खिमा पॅटिसलाही बरीच मागणी आहे. त्याचेही दिवसभरात २०० नग संपतात. पॅटिसमध्येही खिमा आणि पावाचा चुरा मिसळून त्यावर खिम्याचा रस्सा टाकला जातो आणि ते खिमा पॅटिस विथ रस्सा खाताना खवय्ये ‘क्या बात है’ अशी दिलखुलास दादही देतात. दिवसाला २० ते २५ किलो खिमा सहज संपतो. गुडदा मसाला हा येथील आणखी एक लोकप्रिय पदार्थ आहे. भेजा फ्राय, भेजा मसाला आदी पदार्थ आणि या पदार्थाबरोबर खाण्यासाठी रश्श्यातच बुडवलेला पाव कांदा आदी पदार्थाची लज्जतच काही और असते. साधारण २० किलो मसाला दर महिन्याला लागतो. तो लागेल तसा दर महिन्याला ताजा ताजा तयार केला जातो. त्यामुळे चवीत फरक पडत नाही. या मसाल्यामध्ये तमालपत्र, वेलची, लवंग, दगडी फूल आदी पदार्थ असतात. हे पदार्थ चांगले भाजून घेतले जातात आणि त्यानंतर चक्कीमध्ये दळण्यासाठी दिले जातात, असे पंजवानी यांनी सांगितले. गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जात नाही. कोणत्याही पदार्थाच्या चवीचे मूळ त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यात असते. परिणामी पदार्थ उत्तम बनतात. आणखी विशेष म्हणजे येथे गरम पदार्थच दिले जातात. खिमा-पावची ही गाडी फार जुनी असून तिला महापालिकेने परवाना दिला आहे. त्यामुळे खवय्यांना येथे उभे राहूनच खावे लागते. अनेक जण येथून पार्सलही घेऊन जातात. कारण घरी जाऊन शांतपणे बसून खाता येते. वाफाळलेला खिमा पहिल्यानंतर कधी एकदा खातोय असे होते. ‘कलेजी पेठा' एक खाऊन कधीच समाधान होत नाही. त्यामुळे वन मोअरची ऑर्डर दिली जाते. साधारणत: ६० रुपयांमध्ये अर्धा प्लेट पदार्थ मिळतो.