१ एप्रिलपासून योजना लागू ; वर्षांला फक्त ३४४ रुपये वर्गणी भरावी लागणार राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास, दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्षांला फक्त ३४४ रुपये वर्गणी भरावी लागणार आहे. येत्या १ एप्रिलपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. वित्त विभागाने ४ फेब्रुवारीला तसा आदेश जारी केला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सध्या १९८२ ची गटविमा योजना लागू आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्याचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसाला नुकसानभरपाई म्हणून ठोस रक्कम दिली जाते. आता राज्य सरकारने अपघातामुळे कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास नुकसानभरपाई म्हणून ठरावीक रक्कम देण्याची कर्मचारी सामूहिक अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील वर्ग एक ते वर्ग चारच्या अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. सेवानिवृत्तीसाठी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला असेल, तर अशा कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केली जाणार नाही. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाना विमा योजनेसाठी वर्षांला ३०० रुपये वर्गणी व त्यावर ४४ रुपये सेवा कर म्हणजे फक्त ३४४ रुपये भरावे लागणार आहेत. या प्रकारांना विमा संरक्षण लागू नाही.. * नैसर्गिक मृत्यू. आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न * अमलीपदार्थ्यांच्या सेवनामुळे झालेला मृत्यू. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धामुळे झालेला मृत्यू * बाळंतपणात आलेला मृत्यू किंवा अपंगत्व * किरणोत्सर्ग, अणुभट्टय़ा, युद्ध व बंड आदी कारणांमुळे झालेला मृत्यू