तुडुंब गर्दीवर रेल्वेची तातडीची उपाययोजना; रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीची शिफारस भावेश नकाते अपघात प्रकरणानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील गर्दी टाळण्याच्या उपायांचा आढावा घेणाऱ्या दोन समिती केंद्र सरकारने स्थापन केल्या होत्या. यापैकी पश्चिम रेल्वेसाठीच्या समितीने काही तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार आता पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या गाडय़ांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या दोन गाडय़ा धावतात. ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढवणार असून त्यांपैकी पहिली गाडी येत्या महिन्याभरात पश्चिम रेल्वेवर दाखल होईल. दर दिवशी सरासरी ७५ लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय गाडय़ांमधील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवणारी समिती रेल्वे मंत्रालयाने स्थापन केली होती. पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेमार्गासाठी दोन समित्या स्थापन झाल्या होत्या. या दोन्ही समित्यांनी डिसेंबर महिन्यात बैठका घेऊन ३१ डिसेंबपर्यंत आपला अहवाल सादर करणे आवश्यक होते. पश्चिम रेल्वेवरील समितीने अहवाल सादर केला असून त्यात अपघाती मृत्यूंची कारणे, जास्त मृत्यू होण्याची वेळ, ठिकाणे आदी गोष्टींचा समावेश आहे. या कारणांबरोबरच मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांवरही भर देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर १५ डब्यांच्या गाडय़ांची संख्या वाढवावी, असेही या समितीने सुचवले आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या दोन गाडय़ा धावतात. एक गाडी दिवसभरात साधारण १० ते १२ फेऱ्या धावते. म्हणजेच पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या गाडय़ांच्या साधारण २० फेऱ्या दिवसभरात होतात. १२ डब्यांच्या गाडीच्या एका फेरीत गर्दीच्या वेळी साधारण साडेचार हजार लोक प्रवास करतात. यात ३३ टक्क्यांची वाढ धरल्यास हा आकडा साधारण सहा हजार एवढा जातो. १५ डब्यांची आणखी एक गाडी पश्चिम रेल्वेवर धावायला लागली, तर १० फेऱ्यांची भर पडेल. गर्दीच्या वेळी प्रवासी वाहण्याची क्षमता तीन हजारांनी वाढणार आहे. त्यातून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल, असे पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.