; ‘अणुशक्तीनगर’मध्ये सर्वाधिक ७२ हजारावर नावांवर फुली
लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेला गोंधळ लक्षात घेता मतदारांना नोटिसा पाठवून, राजकीय पक्षांना सविस्तर माहिती तसेच आयोगाच्या वेबसाइटवर वगळण्यात येणाऱ्या नावांची यादी जाहीर केल्यानंतरच मग दुबार नावे, पत्त्यावर मतदार न सापडणे, मृतांच्या नावांना कात्री लावून राज्यातील सुमारे ३० लाख मतदारांची नावे वगळून मतदार याद्यांची साफसफाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उपनगरातील सर्वाधिक नावांचा समावेश आहे.
गेल्या एप्रिलपासून ते सप्टेंबरअखेपर्यंत विशेष मोहीम राबवून निवडणूक विभागाने मतदार याद्यांमधील दुबार किंवा मृत तसेच पत्त्यावर न सापडलेल्या मतदारांची नावे तयार केली. ही सारी नावे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच प्रत्येक मतदाराला नोटीस बजाविण्यात आली होती. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना वगळण्यात येणाऱ्या नावांच्या सीडी सादर करण्यात आल्या होत्या. ही सारी प्रक्रिया पूर्ण करूनच सुमारे ३० लाख नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने नव्याने मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू केली असून, छाननीनंतर मतदार याद्यांमध्ये ही नावे समाविष्ट केली जातील.
सुमारे ३० लाख नावे वगळण्यात आल्यावर १ ऑक्टोबर या तारखेला राज्यातील मतदारांची संख्या आठ कोटी, नऊ लाख एवढी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुणे व मुंबईत नावे वगळण्यात आल्यावरून बराच घोळ झाला होता.
चिंचवड आघाडीवर
विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यास पुणे जिल्ह्य़ातील चिंचवड मतदारसंघातील सर्वाधिक नावे गळाली आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील उल्हासनगर (७८,६८६), अंबरनाथ (७५,१५१), मुंब्रा-कळवा (६४,७६९), बेलापूर (४५ हजार) नावे वगळण्यात आली आहेत.

मुंबई उपनगरमध्ये सर्वाधिक नावे वगळली
नावे वगळताना सर्वाधिक सुमारे १० लाख नावे ही मुंबई उपनगर जिल्ह्य़ातून वगळण्यात आली आहेत. ठाणे जिल्हा (सव्वा पाच लाख ), पुणे (तीन लाख, १२ हजार), नाशिक (एक लाख, ८४ हजार), मुंबई शहर (एक लाख, १८ हजार), औरंगाबाद (४२,७३५), रत्नागिरी (३५,७०८), कोल्हापूर (४० हजार), नागपूर (२९ हजार) नावे वगळण्यात आली आहेत.

मतदार याद्यांची साफसफाई
मुंबईतील मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ७२,४७४ मतदारांची नावे ही अणुशक्ती मतदारसंघातील वगळण्यात आली आहेत. बोरिवली (५१,४४५), दहिसर (६५,३७४), मागठाणे (६८,२०७), मुलुंड (३३,०१७), विक्रोळी (२५,०४६), भांडुप पश्चिम (४३,७७९), जोगेश्वरी पूर्व (३२,५८६), दिंडोशी (४१,९४९), कांदिवली पूर्व (३२,६६७), चारकोप (५९,७००), मालाड पश्चिम (५७,१९५), गोरेगाव (२६,८६६), वर्सोवा (३२,९५१), अंधेरी पश्चिम (३७,६९३), अंधेरी पूर्व (२३७९५), विलेपार्ले (४२,९७४), चांदिवली (७२,४७४), घाटकोपर पश्चिम (४४,२२९), घाटकोपर पूर्व (२३,१८०), मानखुर्द शिवाजीनगर (२९,५७५), चेंबूर (३७,३८२), कुर्ला (५०,७९१), कलिना (३०,९३३), वांद्रे पूर्व (५१३४५), सायन कोळीवाडा (३२,५१६), मलबारहिल (१७,२६०), धारावी (१६७६५).