मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या अवजड वाहनांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. अपघातास व वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचांलकांकडून गेल्या दहा दिवसांत १ लाख ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

द्रूतगती मार्गाच्या डाव्या मार्गिकेतूनच अवजड वाहने चालविण्याचा नियम आहे. परंतु चालक बेमुर्वतखोरपणे अचानकपणे मार्गिका बदलून (लेन कटिंग) दुसऱ्या मार्गिकेत जात असताना अनेकदा अपघात घडलेले आहेत. शिवाय वाहतूक कोंडीही होत असते. या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या पुढाकारातून आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्या सहकार्याने १४ एप्रिलपासून ठाणे, नवी मुंबई, रायगड व पुणे जिल्ह्यांत वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची धडक मोहीम राबिवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाली एक पथक वाहतूक पोलिसांना मदत करीत आहे. धोक्याची ठिकाणे त्यांना दाखविली जात आहेत. दहा ठिकाणी तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सोपे झाले आहे. गेल्या दहा दिवसांत लाईन कटिंग करणाऱ्या अवजड वाहनांच्या चालकांकडून १ लाख ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या नियमभंगाबद्दल फक्त शंभर रुपये दंड आहे. अशा वाहनचालकांवर जरब बसविण्यासाठी दंडाची रक्कम वाढविण्याची आवश्यकता आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आता पुढच्या टप्प्यात ताशी ८० किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणाऱ्यांच्याविरोधात धडक कारवाई सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.