राज्यातील मोठय़ा उत्पादकांवर फौजदारी कारवाई सुरू केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने झोपडपट्टय़ांमध्ये होत असलेल्या दूध भेसळीकडे मोर्चा वळवला आहे. चारकोप, मालवणी व धारावी या भागात बुधवारी पहाटे प्रशासनाकडून छापे घालण्यात आले. त्यात ९७० लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला. या वेळी दुधाचे १५ नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले.
दूधभेसळ हा राज्यभरात चिंतेचा विषय आहे. जळगाव, कोल्हापूर तसेच मुंबई-ठाणे परिसरातील दुधाचे नमुने तपासल्यावर त्यात भेसळ तसेच दुधाचा दर्जा कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर राज्यातील दूध उत्पादक व विक्रेत्यांची प्रशासनाने बैठक घेऊन त्यांना भेसळीसंबंधी माहिती दिली. याचदरम्यान विक्रेत्यांवरील कारवाईही सुरू ठेवण्यात आली.  
दूध उत्पादकाकडून ग्राहकांपर्यंत दूध येण्याच्या साखळीत किमान ७ ते १२ मध्यस्थ असतात. प्रत्येक मध्यस्थाला दूधभेसळ आपण न केल्याचे सांगतो. त्यामुळे उत्पादकापासून संकलन, डेअरी, वितरक, किरकोळ विक्रेते अशा सर्वानाच त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, असे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले.