लतादीदी आणि सचिन तेंडुलकरची खिल्ली उडवणारा 'एआयबी'च्या तन्मय भटचा व्हिडिओ समाज माध्यमांतून नष्ट करण्यासाठी सायबर सेलने गुगलकडे धाव घेतली आहे. ‘सचिन व्हर्सेस लता मंगेशकर’ नावाच्या व्हिडीओच्या माध्यमातून विनोदाच्या नावाखाली लतादीदी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडवणारा तन्मयचा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर जोरदार टीका सुरू झाली. बॉलीवूडकरांसह मनसे आणि शिवसेना या राजकीय पक्षांनीही तन्मयचा निषेध व्यक्त केला. तसेच त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. या तक्रारीनंतर सायबर सेलने या प्रकरणी कारवाईस सुरूवात केली आहे. तन्मयचा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी गुगल, फेसबुक आणि यूट्युबशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सायबर सेलचे सहायक पोलीस आयुक्त यशवंत पाठक यांनी दिली आहे. याशिवाय, व्हिडिओ टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या सिस्टीमचा 'आयपी' शोधण्याचेही काम सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सचिन आणि लतादीदींवर अश्लाघ्य टीका करणाऱया तन्मय भटला ठोकून काढण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेेने दिली आहे. तन्मय भट जिथे दिसेल तेथे मनसेचे कार्यकर्ते मनसे स्टाईलने त्याला उत्तर देतील, असे मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले. त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तन्मय विरोधात तक्रार दाखल केली असून त्याच्या अटकेची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या निलम गोऱहे यांनीही तन्मय विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे. याशिवाय, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तन्मय भटवर कारवाई करण्यासाठीचा ई-मेल पाठविल्याचे कळते. ‘एआयबी’च्या या नव्या व्हिडीओबद्दल बॉलीवूडकरांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली असून तन्मय भट आणि मंडळींवर टीकेची झोड उठवली आहे. या नव्या व्हिडीओत तन्मय भटने स्वत:च लतादीदी आणि सचिन तेंडुलकर यांच्या आवाजाची नक्कल करत त्यांच्यात खोटे शाब्दिक युद्ध उभे केले आहे. मात्र हे करत असताना त्याने या दोघांचीही खिल्ली उडवली आहे. लता मंगेशकर यांच्यावर विनोद करताना त्यांच्या आवाजाबरोबरच त्यांच्या चेहऱ्याचीही त्याने टर उडवली आहे. विनोदाच्या नावाखाली लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांची थट्टा करणारा हा प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत बॉलीवूडजनांनी टीका केली आहे. ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता’ म्हणून मी नऊ वेळा पुरस्कार घेतला आहे आणि मला विनोदाची चांगलीच जाण आहे.मात्र ‘एआयबी’च्या या नव्या प्रकाराला विनोद म्हणता येणार नाही’, अशा शब्दांत टीका करत लतादीदी आणि सचिनचा अनादर करण्याचा हा प्रकार असल्याचे अभिनेता अनुपम खेर यांनी म्हटले आहे. तर अशा प्रकारे कुणाचा अनादर करणे याला गंमत किंवा विनोद म्हटले जाऊ शकत नाही. हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याची टीका रितेश देशमुखने केली आहे. सेलिना जेटलीसारख्या अभिनेत्रीनेही हा वाईट प्रकार असून या प्रकरणी ‘एआयबी’ने लता मंगेशकर यांची माफी मागितलीच पाहिजे, असे म्हटले आहे. Mumbai: MNS files complaint against #TanmayBhat over AIB's video captioned 'Sachin vs Lata Civil War' issue pic.twitter.com/pUCrqzKc3s — ANI (@ANI_news) May 30, 2016