डोक्यावर भगव्या रंगाचा भरजरी फेटा, अंगात जाकीट अन् हातात फळांची परडी.. ही मराठमोळी वेषभूषा आहे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची. राज्य सरकारने केलेल्या विनंतीला मान देऊन अमिताभ बच्चन राज्यातील फळांचे विपणन (मार्केटिंग) करणार आहे. राज्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ कोणताही मोबदला न घेता ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. मात्र राजकीय नेत्यांना या जाहिरातीपासून दूर ठेवण्याची अट त्यांनी राज्य सरकारला घातली आहे. राज्यात शेती किंवा शेतीशी निगडित अनेक गोष्टीं आतापर्यंत उपेक्षितच राहिल्या आहेत. देशात सर्वाधिक फळबागांची लागवड राज्यात म्हणजेच १५ लाख ६५ हजार हेक्टर होत आहे. वर्षांकाठी यातून एक कोटी २५ हजार टन फलोत्पादन होते. आंबा, डाळींब, द्राक्ष, संत्री या फळांची तर जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र त्यांचे व्यवस्थित मार्केटिंग होत नसल्यामुळे या फळांना अजूनही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे बाजारपेठेतील हिस्साही मर्यादित आहे. मात्र आता पहिल्यांदाच शेतीचे विशेषत फळबागांचे मार्केटिंग करण्याचा निर्णय फलोत्पानमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला असून त्यासाठी काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यातील फळांच्या विक्रीसाठी सदिच्छा दूत (ब्रँड एम्बॅसेडर) होण्याची विनंती अमिताभ बच्चन यांना केली होती. अमिताभ हे सध्या ‘गुजरात टुरिझम’चे ब्रँड एम्बॅसेडर आहेत. माध्यमांमध्ये ते गुजरातच्या विविध भागांत वावरताना दिसतात. त्याच धर्तीवर त्यांनी महाराष्ट्रील फाळांच्या मार्केटिंगसाठी पुढे येण्याची विनंती सरकारने केली होती. त्यास बच्चन यांनी होकार दिला असून त्यासाठी ते मानधनही घेणार नसल्याची माहिती फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. १ ऑगस्टपासून त्यांच्या जाहिरीती झळकतील, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील शेतकऱ्यांच्या गौरवासाठी फलोत्पादनाचा सदिच्छादूत होण्याचा मान आपल्याला मिळाला याचा आनंद आहे. मला या कामासाठी कोणतेही मानधन नको. मात्र आपल्या जाहिरातीत राजकीय नेत्यांचे फोटोही आपल्यासोबत नकोत.- अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते.