बॉलिवूडचे कलाकार जाणीवपूर्वक शाकाहारी जेवणाचा स्वीकार करू लागले आहेत, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ‘पेटा’ या संस्थेने शाकाहारी सेलिब्रिटी लोकांची यादी प्रसिध्द केली आहे. या यादीत अमिताभ बच्चन आणि विद्या बालन यांना सर्वोत्तम शाकाहारी म्हणून लोकांची पसंती मिळाली आहे.
अमिताभ बच्चन, विद्या बालन यांच्याबरोबर मिस इंडिया नेहा धुपिया, शाहिद कपूर, सोनू सूद, दाक्षिणात्य अभिनेता धानुष, करिना कपूर आणि ड्रीम गर्ल हेमामालिनी यांचीही नावे शाकाहारी लोकांच्या यादीत सर्वात वर आहेत. ‘हल्ली बऱ्याच कलाकारांनी मांसाहार पूर्णपणे वज्र्य करत शाकाहारी जेवणाकडे मोर्चा वळवला आहे. जेव्हा तुमच्यासमोर अमिताभ बच्चन, विद्या बालन अशा लोकांची नावे असतील तेव्हा नक्कीच तुमच्या मनावर त्यांचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही’, असे मत ‘पेटा’ संस्थेच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्वा जोशीपुरा यांनी व्यक्त केले आहे. अमिताभ सलग तीन वेळा सर्वोत्तम शाकाहारी सेलिब्रिटी म्हणून निवडून आले आहेत. गेल्या वर्षी संपूर्ण आशियातून ते विजेते ठरले होते. तर विद्या बालननेही २०१० मध्ये सर्वोत्तम शाकाहारी म्हणून पुरस्कार मिळवला होता. आपल्या उत्तम प्रकृतीचे श्रेय शाकाहारी जेवणालाच असल्याचे विद्याचे म्हणणे आहे.