कुणी, किती तपासल्या, याचा हिशेबच विद्यापीठाला लागेना

राज्यपालांच्या दट्टय़ानंतर येत्या ३१ जुलैपर्यत विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्याची हमी देणाऱ्या मुंबई विद्यापीठाला उत्तरपत्रिकांचा हिशेबच लागत नसल्यामुळे प्राध्यापकांच्या खात्यावर जमा असलेल्या सर्व उत्तरपत्रिका जमा करण्याचे आदेश बुधवारी विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत. प्राध्यापकांच्या नावाने त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या हजारो उत्तरपत्रिका तपासल्या असल्या तरी अजून विद्यापीठापर्यंत पोहचलेल्याच नाहीत. तेव्हा या उत्तरपत्रिका जमा झाल्यानंतरच विद्यापीठाला नेमक्या किती उत्तरपत्रिका तपासल्या आणि किती बाकी आहेत, याचे गणित सुटेल. तेव्हा निकाल जाहीर करण्यासाठी फक्त चार दिवस बाकी राहिले असताना विद्यापीठाची उत्तरपत्रिकांची शोधाशोध सुरू झाली आहे.

ऑनलाइन मूल्यांकन करताना प्रत्येक वेळेस एक उत्तरपत्रिका डाऊनलोड करून ती तपासणे आणि पुन्हा ती अपलोड करणे, हे वेळखाऊ  काम होते. यासाठी  प्राध्यापकांच्या सोयीने एकाच वेळी जास्त संख्येने उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यावर डाऊनलोड करून घेण्याची सुविधा होती. प्राध्यापकांनी त्यानुसार ३० किंवा ५० च्या संख्येने उत्तरपत्रिका डाऊनलोड केल्या आहेत. या उत्तरपत्रिका तपासल्या तरी त्या पुन्हा अपलोड मात्र त्या-त्या वेळेस केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे काही विषयांच्या उत्तरपत्रिका या तपासल्या जरी असल्या तरी त्या अद्याप विद्यापीठापर्यंत पोहचलेल्याच नाहीत. त्यामुळे नेमक्या किती उत्तरपत्रिका अजून तपासायच्या बाकी आहेत याचा हिशेबच विद्यापीठाला लागणे अवघड झाले आहे. यासाठीच आपल्या खात्यावर जमा असलेल्या उत्तरपत्रिका लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश विद्यापीठाकडून प्राध्यापकांना देण्यात आले आहेत. तसेच आता एक उत्तरपत्रिका डाऊनलोड करून ती तपासून लगेच अपलोड करणेही प्राध्यापकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

काही प्राध्यापकांनी आपल्या खात्यावर उत्तरपत्रिका जमा केल्या आहेत. परंतु काही कारणाने ते उत्तरपत्रिका तपासू शकत नाहीत. अशा प्राध्यापकांच्या खात्यावरील उत्तरपत्रिका अडकून राहिल्या आहेत. या उत्तरपत्रिका परस्पर काढून अन्य प्राध्यापकांकडे देण्यात येत आहेत. त्यामुळे अमुक एका विषयाच्या किती उत्तरपत्रिका पूर्ण तपासण्यात आल्या आहेत, याचा विद्यापीठालाही अंदाज येत नाही.

अपलोडिंगअजूनही सुरूच

विषयाच्या एकूण अपलोडेड उत्तरपत्रिकांच्या संख्येत मागील दोन दिवसांपासून वाढ होत आहे. यामुळे काही विषयांच्या उत्तरपत्रिका अजूनही अपलोड होत असल्याच स्पष्ट होत आहे. यामुळे मात्र काही विषयाच्या प्राध्यापकांना त्यांच्या खात्यावर ‘ठ फी२स्र्ल्ल२ी’ असा संदेश येतो. मात्र दोन दिवसांनंतर काही उत्तरपत्रिका तपासणीसाठी आलेल्या दिसतात. यामुळे विद्यापीठाला एका विषयाच्या परीक्षेला नेमकी किती विद्यार्थी बसले आणि किती उत्तरपत्रिका उपलब्ध आहेत, हेच माहीत नसल्याची शंका अनेक प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.

[jwplayer foZbYcRm]

पूनर्मूल्यांकनाबाबत प्राध्यापकांत संभ्रम

  • नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुनर्मूल्यांकन कसे करावे याबाबत विद्यापीठाने मार्गदर्शन केले नसल्याने प्राध्यापकांचा गोंधळ उडाला आहे.
  • आत्तापर्यंतच्या व्यवस्थेमध्ये २५ ते ३५ गुणांमधील दहा टक्के विद्यार्थी, ८० गुणांच्या पुढील दहा टक्के विद्यार्थी आणि यांच्या मधले गुण मिळविणारे पाच टक्के विद्यार्थी यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले जात होते; परंतू आता पुनर्मूल्यांकनासाठी येणाऱ्या उत्तरपत्रिकांवर एकूण गुणच नमूद केलेले नसतात. त्यामुळे वरील पैकी कोणत्या गटामध्ये या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, हेच समजणे कठीण झाले आहे.
  • शिक्षकांना सर्व उपप्रश्नांची बेरीज करून एकूण गुण काढून त्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याचे काही प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
  • एकूण गुण न समजताच केलेले मूल्यांकन हे खऱ्या अर्थाने पुनर्मूल्यांकन आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न प्राध्यापकांने तपासून त्याप्रमाणे त्याचे नवीन गुण देण्यात यावेत, असे काही प्राध्यपकांनी सांगितले आहे.