पणन संचालकांनी व्यापाऱ्यांच्या कमिशनमध्ये कपात करण्याच्या निर्णय घेतला होता. त्याविरोधात तुर्भे येथील भाजी व फळे व्यापाऱ्यांनी पुकारलेला एक दिवसीय बंद आज यशस्वी ठरला.
दरम्यान कांदा-बटाटा बाजारात एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या आत्महत्येचा बंदशी काहीही संबध नसून ही आत्महत्या केवळ वैयक्तिक कर्जामुळे करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पणन संचालकांनी राज्यातील सर्व बाजार समितीत व्यापारी घेत असलेल्या कमिशनमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात पुणे व नाशिकमधील व्यापाऱ्यांनी आवाज उठविला. पाच ते दहा टक्के असलेले कमिशन कमी करून सरकारला काय मिळणार आहे, असा सवाल या व्यापाऱ्यांनी उपस्थित करीत चार दिवस बंद पाळला. त्या बाजारातील शेतमाल मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीकडे वळला. त्यामुळे मुंबईत काही काळ स्वस्त भाजी मिळण्याची शक्यता निर्माण झाली.
नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी फळे आणि भाज्यांच्या विक्रीतून पुरेपूर नफा वसूल केला आणि नंतर एक दिवसाचा बंद पुकारला. हा बंद १०० टक्के यशस्वी झाला खरा, पण हा बंद कशासाठी असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
सरकारने कमिशन प्रश्नावर एक अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नाशिक, पुण्याच्या व्यापाऱ्यांनी गुरुवारीच हा बंद मागे घेतला. त्यामुळे एपीएमसीतील बंद कोणासाठी असा
सवाल काही ग्राहक करीत आहेत.     
बटाटा व्यापाऱ्याची आत्महत्या

बंद दरम्यानच पांडुरंग गुंड यांच्या गाळ्यात, कांदा- बटाटा बाजारातील राधेश्याम मोर्या या बटाटा व्यापाऱ्याने फास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करताना या व्यापाऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले आहे. ही आत्महत्या उधारी किंवा कर्जबाजारीपणामुळे केली असावी असे पोलिसांनी सांगितले.