खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांना विरोध करत लाखभर रिक्षाचालक संपावर उबर, ओला अशा खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांना विरोध करण्याबरोबरच रिक्षा चालकांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने बुधवारी संपाची हाक दिली असून या संपात मुंबईतील जवळपास सर्वच रिक्षा सहभागी होणार आहेत. या संपात मुंबईतील तब्बल ९० टक्के रिक्षाचालक सहभागी झाले आहेत. रिक्षाक्षेत्रात या संघटनेचे वर्चस्व असल्याने काल मध्यरात्रीपासूनच अनेक रिक्षा रस्त्यावरच उतरलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई उपनगरांमधील प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून बेस्टतर्फे जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या प्रवाशांचा ओघ वाढल्यामुळे बेस्ट बसेसमध्येही मोठी गर्दी दिसत आहे. उबर, ओला या कंपन्यांविरोधात स्वाभिमान आणि जय भगवान महासंघ या संघटनांनी सोमवारी संप पुकारला होता. पण परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मध्यस्थी केल्यानंतर रविवारी रात्री हा संप मागे घेण्यात आला होता. त्या वेळी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने आपला संप बुधवारी होणार असल्याची ठाम भूमिका घेतली होती. हीच भूमिका कायम ठेवत आता मुंबईतील १ लाख चार हजार रिक्षा चालक-मालक संपावर जाणार आहेत. हा संप एक दिवसाचा लाक्षणिक संप असून संपादरम्यान संघटनेचे अध्यक्ष शशांक राव परिवहन आयुक्त प्रविण गेडाम यांना निवेदन देणार आहेत. माहीम आणि शीव यापुढे मुंबईत टॅक्सीची सद्दी असली, तरी उपनगरांमधील लाखो प्रवासी दर दिवशी बेस्टच्या बसगाडय़ांबरोबरच रिक्षाने प्रवास करतात. बुधवारी बंद असल्याने प्रवाशांना सर्वस्वी बेस्टच्या सेवेवर अवलंबून राहावे लागणार आहे. यात वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, अशा महत्त्वाच्या स्थानकांमध्ये उतरणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.