मुंबईतील भिवंडीमध्ये एका रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. भिवंडीमधील शिवाजी नगर परिसरात रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. या रिक्षामध्ये तीन प्रवाशी होते. यामध्ये महिलेचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन रिक्षाला लागलेली आग आटोक्यात आणली. तसेच अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी प्रथम शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात  हलविण्यात आले आहे. या अपघातामधील जखमींच्या दुखापतीची तीव्रता नक्की किती आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच रिक्षाला नक्की कशामुळे आग लागली याचे कारण देखील स्पष्ट झालेले नाही.