लोकशाहीर अमर शेख यांचा आज जन्मदिन. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने, महाराष्ट्रातील लोककलांच्या प्रवासाविषयीचे एक मुक्तक.

सर्व लोकलांमध्ये सहजपणणे आलेला परंपरेचा भाग दर पिढीत प्रवाहित होत असतो. सर्व लोककला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळत असतात. शिवाय दर पिढी त्यात आपापल्या प्रकृतिपिंडानुसार भर-घटही करीत असते. त्यामुळे लोककलांमध्ये परंपरा व परिवर्तन यांचा मेळ असतो. त्यामुळे लोककलांचा आविष्कार सदैव ताजा व जिवंत असतो. लोककलांना कृत्रिम बांधीलकी वर्ज्य असते. जाणीवपूर्वक कोणतीच बांधीलकी लोककला स्वीकारीत नाहीत. नेणीवेतून उत्स्फूर्तपणे उसळून आलेला आविष्कार हा लोककलांचा प्राण असतो, म्हणूनच लोककलेचा प्रत्येक आविष्कार नित्यनवा असतो. परंपरेचेही काटेकोर बंधन लोककला मानीत नाही.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

तरीही , ग्रामीण भागात जन्मलेली आणि ग्रामीण महाराष्ट्राने जोपासलेली लोककला आज शहरांच्या वातानुकूलित रंगमंचांवर आल्यापासून तिची काहीशी घुसमट सुरू असावी असे मला वाटते. लोककला परंपरावादी होत्या. त्यांनी तसे असलेही पाहिजे. कारण, प्रत्येक पिढीला नवे काहीतरी हवे असते. अलीकडे तर जुन्याविषयीचे प्रेम शहरी भागात कमी होत असावे अशी शंका येते. त्यामुळे लोककलाही त्याला अपवाद नाहीत. लोककलांच्या सादरीकरणाचा बाज बदलण्याचे ते एक अपरिहार्य कारण असावे. तरीदेखील, त्या आधुनिकतेशी जुळवून घेताना लोककलाच आपली परंपरा हरवून बसणार नाहीत ना, अशी भीतीही वाटते. अर्थात लोककलांनी नव्या बदलाचा स्वीकार कोठपर्यंत करावा हे सांगण्याएवढा मी या क्षेत्रातला जाणकारही नाही. पण तरीही, ग्रामीण भागात, तंबूतल्या तमाशात दिसणारी अस्सल मराठमोळी लोककला आणि सिनेमाच्या पडद्यावरील एखाद्या कथानकात दिसणारी तमाशा परंपरा यांच्यात जमीन अस्मानाचे अंतर असावे असे जाणवते. ग्रामीण बाज दाखवूनदेखील सिनेमाच्या पडद्यावरील तमाशा उगीचच आधुनिक वाटू लागतो, आणि या अस्सल लोककलेची नाळ जुन्या परंपरेपासून कुठेतरी तुटतेय की काय असे वाटू लागते. अर्थात, हा एक ढोबळ विचार आहे. लोककलेचा ग्रामीण बाज जपणे गरजेचे आहे, एवढाच या विचारामागचा धागा आहे. तो जपला जात असेल अशी या क्षेत्रातील जाणकारांची खात्री असेल, तर ते समाधानकारकच आहे.
लोककला शहरांपर्यंत, नव्या संस्कृतीपर्यंत पोहोचलीच पाहिजे असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा त्यामागे एक विचार असतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची, परंपरांची लोककलेच्या माध्यमातून कशी जपणूक झाली, ती परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे ही त्यामागची भावना असते. तसे असेल, तर आधुनिकतेचा स्वीकार करण्याची मर्यादा ठरवून घेतली पाहिजे. नाहीतर संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनाच्या करमणुकीच्या या निखळ परंपरेची सच्चाई समजणारच नाही आणि गैरसमजांचीच भर पडेल. असे झाले, तर त्याचा परिणाम पोषक नसतो. मग त्याचा स्वीकार सहज केला जात नाही. सहाजिकच, लोकाश्रय कमी होऊ लागतो, आणि लोककलांचे अस्तित्वच संकटात येऊ शकते. हे केवळ लावणी किंवा तमाशाविषयीच नाही. ग्रामीण महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये केवळ लावणी आणि तमाशाच नाही, तर जात्यावरची ओवीगीते, कांडपगीते, अंगाई गीते, सणासुदीची क्रीडानृत्ये व त्याची गाणी, नाट्यकला, दशावतारीसारखी कोकणी कला, सोंगी मुखवट्यांसारखी वैदर्भीय लोककला, ग्रामीण हस्तकला अशा अनेक आविष्कारांचा त्यामध्ये समावेश आहे. या साऱ्या कला, त्यांच्या त्यांच्या नैसर्गिक गुणांसह जोपासल्या गेल्या तर त्यातला निखळपणा जपला जाईल. अभिसरणाच्या प्रक्रियेतही, नागरीकरणाला शरण जायचं नाही, एवढ्या निर्धारानेच लोककलांचे संगोपन आणि संवर्धन झाले पाहिजे.

अगदी चारपाच दशकांपूर्वी, लोककलांच्या सादरीकरणाला स्थळकाळाचे बंधन नसे. एकदा हा आविष्कार सुरू झाला, की रात्र कधी सरली याचेही भान राहात नसे. तोच कलाविष्कार आज मुंबईसारख्या शहरात जेव्हा साजरा होतो, तेव्हा रंगात येण्याआधीच आवराआवर सुरू करावी लागते, मग त्याच्या निखळ सादरीकरणावरच बंधने येतात. त्यामुळे शहरातील साऱ्या बंधनांचे भान राखून त्याची आखणी करावी लागते, आणि साहजिकच लोककलांचे नागरीकरण सुरू होते. हे कदाचित नागरी भागात टाळता येणार नाही. पण म्हणूनच, ग्रामीण भागात, जिथे लोककलांचा जन्म झाला आहे, तेथे मात्र, त्या जपण्यासाठी अशा शहरीकरणाबरोबर स्वीकारलेल्या तडजोडी आडव्या येऊ नयेत, याची काळजी लोककलावंतांनी घेतली पाहिजे.

लोककलेच्या क्षेत्रातील जुनी पिढी ज्या जोमाने या कलेच्या संवर्धनासाठी झटली, तेवढ्याच जोमाने ही कला जपणारी आणि जोपासणारी पिढी तयार होणे हीदेखील लोककलांची गरजच आहे. लोककलांचा अस्सल बाज टिकविण्याचा ध्यास या पिढीच्या अंगी असायला हवा. तो तसा असेल, तर लोककलांच्या भविष्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही. केवळ करमणूक हे लोककलांचे ध्येय नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. आज आपण ज्यांचे स्मरण करत आहोत त्या शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. त्यांची कविता लोकांच्या हृदयात रुजली होती. सामान्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपली प्रतिभा वेचली. आज त्यांच्या स्मृती जपताना, लोककलांची ही जबाबदारी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.