मुंबईत आजपासून प्रदेश कार्यकारिणी बैठक; सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची चिंता

वादग्रस्त ठरलेले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर झालेले आरोप या पाश्र्वभूमीवर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारवर आरोप होत असताना आणि विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असताना त्यांना कसे तोंड द्यायचे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह केंद्र व राज्य सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत कसे पोचवायचे, याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय सहसरचिटणीस व्ही सतीश आदींसह पक्षाचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीची बैठकही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सायंकाळी झाली. त्यात कार्यकारिणीची रूपरेषा आणि राजकीय ठरावांबाबतही चर्चा करण्यात आली. दानवे यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये आरोप झाले. त्यांच्या संस्थेने शाळा बळकावण्याचे प्रकरण आणि वीज बिल थकविल्याबद्दलचे प्रकरण प्रसिद्धी माध्यमांनी लावून धरले. त्यामुळे पक्षाचीही बदनामी झाली. प्रदेशाध्यक्ष, मंत्री व सरकारवर विरोधक आणि प्रसिद्धी माध्यमांमधूनही टीकास्त्र सोडले गेले. तर मेहता, देशमुख आणि सुभाष देसाई यांच्यावरही आरोप झाले. मेहता यांची लोकायुक्तांकडून चौकशी होणार आहे. गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या महत्त्वाच्या निर्णयांकडे दुर्लक्ष होत आहे. तर कर्जमाफीवरूनही शेतकरी संघटना, विरोधक व शिवसेना भाजपला लक्ष्य करीत आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षाने कोणती पावले उचलावीत आणि सरकारला साहाय्य करावे, याविषयी रूपरेषा ठरविली जाईल. कर्जमाफीबाबत गावागावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन प्रचार करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.