मोडकळीस आलेल्या चाळी व इमारतींचे पुनर्निर्माण धोरण उद्या जाहीर होणार आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी शिवसेना भाजपमध्ये श्रेयासाठी लढाई सुरू झाली असून गृहनिर्माण धोरणावरून त्याची चुणूक दिसू लागली आहे. मोडकळीस आलेल्या चाळी, म्हाडाच्या इमारती, संक्रमण शिबीरे यामधील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्यावर भाजपनेही कुरघोडी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या मतदारसंघात दोन सप्टेंबरला घाटकोपरला गृहनिर्माण धोरणाची घोषणा केली जाणार आहे. त्याचा ‘भाजप सरकारची वचनपूर्ती’ असा प्रचार भाजपने सुरू केला आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढे आलेल्या विकासकांना जादा चटईक्षेत्र निर्देशांकासह आणखी काही सवलती दिल्या जाणार आहेत. उपनगरातील जुन्या व उपकरप्राप्त इमारती, मोडकळीस आलेल्या इमारती, संक्रमण शिबीरे, म्हाडा वसाहती, बीडीडी चाळी यांची संख्या सुमारे २० हजाराहून अधिक आहे. त्यामध्ये लाखो रहिवाशांचे अनेक प्रश्न असून पुनर्विकास रखडला आहे. वर्षांनुवर्षे सरकारदरबारी खेटे घालूनही या चाळी व इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांच्या समस्या कायम आहेत. त्यामध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असल्याने शिवसेनेने त्याबाबत अनेकदा आवाज उठविला होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या लाखो रहिवाशांच्या प्रश्नातून मार्ग कसा काढता येईल, यासाठी उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना काही दिवसांपूर्वी ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावून चर्चा केली होती. पण याचे सारे श्रेय शिवसेना घेईल, या भीतीने मुख्यमंत्री फडणवीस व ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन सप्टेंबरला गृहनिर्माण मंत्र्यांच्या मतदारसंघात घाटकोपर (पूर्व) येथे आचार्य अत्रे मैदानात गृहनिर्माण धोरणाची घोषणा होणार आहे. कांदिवली, बोरीवलीतील रहिवाशांसाठी चारकोप येथे एसटी बसस्थानकाचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी, बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. परिवहन मंत्री व एसटी अध्यक्षपद दिवाकर रावते यांच्याकडे असूनही त्यांना किंवा महापौर, अन्य शिवसेना नेते आदींना या कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले नव्हते. ‘भाजपची वचनपूर्ती’ असा प्रचार सुरू करण्यात आला आहे.